कलोल – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान झाले मात्र त्याचवेळी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार सुरू होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रचारसभेत कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांच्या संदर्भात रावणाचे जे वक्तव्य केले त्याला आज पंतप्रधानांनी उत्तर दिले.
कलोल येथे झालेले सभेत बोलताना मोदी म्हणाले, कॉंग्रेस पक्षाला राम सेतुचाही द्वेष आहे. पंतप्रधान पदाचे महत्व कमी करण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा लागली आहे की पंतप्रधानांना कोण सगळ्यांत जास्त शिव्या देतो. आता तर मला शिव्या देण्यासाठी त्यांनी रामायणातून रावणही आणला. एका रामभक्ताला रावण म्हणणे चुकीचे आहे. ते जितकी चिखलफेक करतील तेवढे कमळ अधिक फुलेल. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे एक नेते म्हणाले की मोदींना कुत्र्यासारखे मारू. मग दुसरा म्हणाला की ते हिटलरप्रमाणे मरतील.
कोणी रावण म्हणतोय तर कोणी झुरळ म्हणतोय. गुजरातने मला जी ताकद दिली आहे त्यामुळे कॉंग्रेस अस्वस्थ आहे. कॉंग्रेसचे एक नेते म्हणतात या निवडणुकीत मोदींना त्यांची लायकी दाखवू. एवढे झाल्यावरही कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटले अजुन काही करणे बाकी आहे म्हणून त्यांनी खर्गे यांना पाठवले. मी खर्गे यांचा आदर करतो. मात्र ते तेच म्हणाले जे त्यांना सांगण्यात आले. मोदी शंभर तोंडे असलेला रावण आहेत असे ते म्हणाले. पण त्यांना कल्पना नाही की गुजरातची ही भूमी रामभक्तांची भूमी आहे.
दरम्यान, त्यांनी यावेळी राज्य सरकारच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले की गुजरातच्या लोकांनी जेव्हा 2014 मध्ये मला दिल्लीला पाठवले तेव्हा तेथे मोबाइल फोन तयार करणो केवळ दोनच कारखाने होते. आता त्यांची संख्या 200 पेक्षा जास्त आहे. राज्यात पुन्हा एकदा कमळ फुलले पाहिजे असे आवाहन मतदारांना करताना ते म्हणाले की मी गुजरातचा मुलगा आहे. या राज्याने मला जे गुण दिले आहेत, जी ताकद दिली आहे तेच कॉंग्रेसच्या अस्वस्थतेचे कारण आहे.