राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा पंतप्रधानांना टोला
नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ब्रिटिशांचे खबरी असणाऱ्यांनी कॉंग्रेसच्या वारसाबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित करु नये, अशा शब्दांमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. जयपूरमधील एका कार्यक्रमामधील भाषणात त्यांनी भाजपाच्या धोरणांचा समाचार घेतला.
कॉंग्रेसच्या 135 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये गेहलोत यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी, राज्यघटना धोक्यात असून लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,असे मत व्यक्त केले. एकीकडे कॉंग्रेसला मोठा वारसा आहे जो आपण अभिमानाने सांगू शकतो. संपूर्ण देशाला याचा अभिमान आहे. अशा वारसाबद्दल पंतप्रधान मोदी काय बोलतात सर्वांना ठाऊक आहेच.
पंडीत नेहरुंच्या वारसाबद्दलही ते काय बोलतात हे ही तुम्हाला ठाऊक आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की पंडीत नेहरुंचा वारसा हा बलिदानाचा आहे. ते देशासाठी तुरुंगात जाण्याचा त्यांचा वारसा आहे. देशाचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. हा कॉंग्रेसचा खरा वारसा आहे. तुमच्या पक्षाची विचारसरणी असणारे लोक हे स्वातंत्र संग्रामामाध्ये ब्रिटीशांचे खबरी होते. ते ब्रिटीशांसाठी खबऱ्याचे काम करायचे. आता हे असे लोक कॉंग्रेसच्या वारसाबद्दल बोलणार. खरोखर हे लज्जास्पद आहे, असा टोला गेहलोत यांनी लगावला.
यावेळेस बोलताना गेहलोत यांनी देशाची राज्यघटना धोक्यात असल्याचे मत व्यक्त केले. सर्वच संस्थांचा कारभार सरकारने उद्ध्वस्त केला आहे. न्यायसंस्था, निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी आणि आयकर विभागासारख्या संस्थांवर सरकारचा दबाव टाकू पाहत आहे. पंतप्रधान कार्यालयाला विश्वासात ठेऊनच हे सर्व निर्णय घेतले जातात. सर्व निर्णय पंतप्रधान कार्यालयातच घेतले जातात. देशाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे हे समजत नाही, अशा शब्दांमध्ये गेहलोत यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.