गेहलोतांची भाजपवर जहरी टीका
जयपूर:’ब्रिटिशांचे खबरी आज कॉंग्रेसचा वारसा विचारत आहेत’ अशी तिखट टिपणी करत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज भाजपवर जहरी टीका केली. कॉंग्रेस पक्षाच्या व्या स्थापना दिनानिमित्ताने आज जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत, ‘देशाचं संविधानच सध्या धोक्यात असून सर्वत्र लोकशाहीच्या आवाजाची गळचेपी सुरु आहे.’ असा आरोप केला.
यावेळी गेहलोत यांनी कॉंग्रेसचा वारसा विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, “पंतप्रधान कॉंग्रेसचा वारसा विचारतात, ते पंडित नेहरूंवर टीका-टिपणी करतात मात्र इतिहासात झाकून पाहिलं तर कॉंग्रेसचा वारसा हा देशासाठी केलेल्या त्यागाचा आणि बलिदानाचा आहे. मात्र त्यांच्या पक्षाचा वारसा शोधल्यास तो मात्र इंग्रजांना माहिती पुरवल्याचा सापडेल.”
देशातील संविधानिक संस्थांची स्वायत्तता मोदी सरकारने हिरावून घेतल्याचा आरोप करताना ते म्हणाले, “देशामध्ये सध्या सर्व संस्थांना उध्वस्त केलं जातंय. न्यायपालिका, निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, प्राप्तिकर विभाग यांच्यावर दबाव आणला जातोय. सगळे निर्णय आता राजकीय स्वार्थासाठी पंतप्रधानांच्या कार्यालयातूनच घेतले जातायेत. हि सर्व परिस्थिती पाहून भाजप सरकार या देशाला कुठं घेऊन चाललंय असाच प्रश्न पडतो.”