केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती
नवी दिल्ली: ब्रिटन मधील विरोधी पक्षांच्या खासदार डेब्बी अब्राहम यांच्याकडे भारताचा वैध व्हिसा नव्हता. त्यामुळेच त्यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आला, असे सरकाच्या वतीने अधिकृतपणे सांगण्यात आले. भारताने काल दिल्ली विमानतळावरूनच त्यांना परत पाठवण्यात आले. केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अब्राहम या ई बिझनेस व्हिसावर आधारे भारतात आल्या होत्या. त्यांनी देशाविरोधात केलेल्या कृत्यांमुळे हा व्हिसा रद्द करण्यात आला होता. याची माहिती त्यांना 14 फेब्रुवारी रोजीच कळवण्यात आली होती, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
व्हिसा देणे अथवा रद्द करणे हे पुर्णपणे त्या देशाचा अधिकार आहे. देसाच्या या अधिकाराचा आदर सर्वांनी करायला हवा, असेही या सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान अब्राहम यांना गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला ई बिझनेस व्हिसा देण्यात आला होता व त्या व्हिसाची मुदत 5 ऑक्टोबर 2020 पर्यंत होती.
पण त्यांनी भारत विरोधी भूमिका घेतल्याने देश हितासाठी त्यांना भारतात येण्यासाठी मनाई करण्यात आली आणि त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. ही बाब 14 फेब्रुवारी रोजीच त्यांना कळवण्यात आली असताना तरीही त्या भारतात आल्याने त्यांना येथून परत पाठवण्यात आल्याचा खुलासा सरकारी सूत्रांनी केला आहे. डेबी अब्राहम या ब्रिटनच्या खासदारांचा काश्मीर विषयी जो गट स्थापन करण्यात आला आहे त्याच्या अध्यक्षा आहेत. त्यांना सोमवारी दिल्ली विमानतळावरूनच बाहेर घालवून देण्यात आले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी आपल्याला विमानतळावर एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक दिली असा त्यांचा आरोप आहे.
त्यांना व्यावसायिक कारणांसाठी व्हिसा देण्यात आला. त्याचा अर्थ त्यांनी व्यावसायिक बैठकीसाठी देशांत प्रवेश दिला होता. कुटुंबियांना भेटण्यासाठी अथवा पर्यटनासाठी त्याचा वापर करता येणार नाही. नियमाप्रमाणे ते मान्य होणारे नाही. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र व्हिसा अर्ज दाखल करायला हवा होता, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.
कॉंग्रसचे खासदार आणि विरोधी नेते अभिषेक सिंघवी यांनी अब्राहम यांना परत पाठवण्याच्या कृतीला पाठींबा दिला आहे. त्या केवळ खासदार नाही आहेत. तर त्या पाक सरकार आणि आयएसआयशी संबंधित म्हणून ओळखल्या जातात. भारताच्या सार्वभौमत्वावर होणारा प्रत्येक हल्ला परतावला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.