कामशेत-जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पाथरगावच्या हद्दीमध्ये इंद्रायणी नदीवर ब्रिटिश राजवटीत 1896 साली बांधण्यात आलेल्या पुलाने 125 वर्ष पुर्ण केली आहेत. मात्र, एमएसआरडीसी कडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या या पुलाला बाहेरील बाजूने मागील अनेक वर्षांपासून पिंपळ, वड, उंबर आदी जातीच्या वृक्षांनी वेढले आहे. खोलवर पसरणाऱ्या या झाडांच्या मुळ्यांनी अक्षरशः पूल पोखरला आल्याचे चित्र आहे. यामुळे दोन दगडांमध्ये झाडा-झुडूपांची मुळे शिरल्याने पूल कमकुवत झाला आहे.
सुमारे सव्वाशे वर्ष जुन्या दगडी चिरेबंदी पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असूनही प्रशासनाच्या वतीने दर्शनी भागात तात्पुरत्या स्वरूपाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामूळे हा पूल बाह्य बाजूस सुस्थितीत असल्यासारखा भासतो. या ठिकाणावरून जाणाऱ्या वाहनांना तीव्र वळणावरून जावे लागते. परंतु, या पुलावर कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर बसविण्यात आलेले नाहीत.
याबाबत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
वेळीच दुरुस्तीची गरज
मावळात पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर येत असतो. सध्या नदीपात्रात कमी प्रमाणात पाणी असल्याने या पुलाला वेढलेली झाडे-झुडुपे काढणे फारसे धोकादायक नाही. तर पुलाच्या चिरांमध्ये झाडांची मुळे शिरल्याने नदीपात्रातील पाणी, उन व वाऱ्यामुळे दिवसेंदिवस हा पूल कमकुवत होत चालला आहे. त्याची वेळीच दुरस्ती करण्याची गरज आहे.