मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे भाजपा आणि शिंदे गटाकडून सत्ता राखण्याचे आणि बहुमत मिळवण्याचे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे मविआकडून मात्र तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवण्याबाबत भूमिका मांडल्या जात असताना याबाबतच्या वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, या संदर्भात आज राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.
आगामी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र? यासंदर्भात अजूनही संभ्रम निर्माण झाला आहे. याविषयी बोलताना अजित पवारांनी स्पष्टपणे मविआ एकत्र राहणार असल्याची भूमिका मांडली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “स्टॅम्प आणा, मी लिहून देतो. महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार”.
एकत्र निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनी, “अशा प्रकारच्या चर्चा चालतात. एका पक्षातही वेगवेगळे विचार समोर येतात. शेवटी अंतिम निर्णय त्या पक्षाचे सर्वोच्च नेते घेतील. त्याची अंमलबजावणी त्या पक्षाचे कार्यकर्ते करतात”, असेही अजित पवारांनी यावेळी म्हटले. तसेच पुढे बोलताना “आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार असतो. मविआची एकी राहावी म्हणून वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असतात. त्यामुळे त्यातून वेगळा अर्थ काढू नका”, असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून मविआमधील काही नेत्यांकडून वेगळ्या प्रकारची भूमिका मांडण्यात आली होती. मविआमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस की काँग्रेस मोठा भाऊ आहे, यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार आदी नेत्यांनी भूमिका मांडली होती. यावरून आता मविआच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.