यवत – दौंडच्या शेतीच्या पाण्यासाठी मुळशीचे पाणी दौंडमध्ये आणणार असून यासाठी वाटेल तो प्रयत्न करण्याची तयारी ठेवली आहे. याकरीता शेतकऱ्यांचा, जनतेलचा पाठींबा असणेही आवश्यक आहे, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. पश्चिम भागातील विविध गावात आयोजित बोरीऐंदी येथे 11 कोटी 21 लाख रुपये खर्चाच्या कासुर्डी-बोरीऐंदी ते डाळिंब, पुणे-सोलापूर महामार्ग ते बोरीऐंदी रस्ता, बोरीऐंदी ते दरेकर वाडी ते ताम्हाणवाडी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कुल यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे, दौड तालुका भाजपाचे अध्यक्ष गणेश आखाडे, युवराज बोराटे, राजेंद्र तावरे, ग्रामपंचयत सदस्य, सोसायटी सदस्य यांच्यासह आदी उपस्थित होते.
आमदार कुल म्हणाले की, आतापर्यंत अनेक बाबतीत विकास झाला असून यापुढेही विकासाची गती कायम ठेवायची आहे. भविष्यात कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड, माजी चेअरमन मुरलीधर भोसेकर यांचीही भाषणे झाली. प्रास्तविक राजेंद्र तावरे यांनी केले. एम.जी. शेलार यांनी आभार मानले.