महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात गेली अनेक वर्षे युवा नेत्यांची एक परंपरा सुरू आहे. ही परंपरा सुरू करण्याचे सारे श्रेय शरद पवार यांच्याकडे जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या भवितव्याचा आणि भविष्याचा वेध घेऊन शरद पवारांनी राजकारणात दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, जयंत पाटील अशा तरुणांना संधी दिली. हे तरुण नेते आज आपल्या कामांच्या माध्यमातून सतत आपल्या मतदारसंघात निवडून येत आहेत. तसेच राज्यात आपली चमक दाखवत आहेत. यामध्ये कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील हे निष्कलंक नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रभावीपणे पुढे आले आहेत.
– संजय गवारी
सभापती आंबेगाव तालुका पंचायत समिती
हल्लीच्या राजकारण्यांमध्ये ज्या मोजक्या लोकांना समाजकार्याची उत्तम जाण आहे. समस्या समजून त्यावर उपाय शोधायची समज आहे. त्यामध्ये मंत्री वळसे पाटलांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. विषयाची उत्तम समज, प्रश्नांची नेमकी जाण, समजावून सांगण्याची हातोटी आणि कृतिशीलता ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच सध्याच्या आणि भावी महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत मंत्री वळसे पाटील हे नाव आघाडीवर असणार आहे.
डिसेंबर 2002मध्ये मंत्रिपद मिळाल्यापासून मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कर्तृत्वाला मोठा वाव मिळाला. त्यांच्याकडे अर्थ आणि नियोजन, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण ही खाती आली. जेव्हा त्यांच्याकडे ऊर्जा खाते आले तेव्हा राज्यात विजेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी पूर्ण परिस्थिती जाणून घेऊन विद्युतक्षेत्र स्वयंपूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. वीजनिर्मिती प्रकल्प उभारणे किंवा त्यात गुंतवणूक करणे गुंतागुंतीचे असताना त्यांनी जुन्या वीज प्रकल्पांची क्षमता वाढवली आणि नवीन वीज प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले. एकेकाळी महाराष्ट्र इतर राज्यांना वीज देत होता.
पुढच्या काळात औद्योगिक क्षेत्रात झालेली गुंतवणूक, कृषी पंपाची वाढलेली संख्या यामुळे विजेच्या मागणीत जबरदस्त वाढ झाली. राज्यात दरवर्षी 50 हजार नवीन कृषीपंप वाढू लागले. देशाचा विचार केला तर सरासरी 70 हजार मेगावॅट विजेची टंचाई भासू लागली. राज्यातही विजेची मागणी आणि उपलब्धता यामध्ये 6 हजार 800 मेगावॅटपेक्षा जास्त तुट होती. या साऱ्यांचा विचार करून मंत्री वळसे पाटलांनी ऊर्जा खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विद्युत निर्मिती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी काम सुरू केले. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून वीज निर्मिती, वीजपारेषण, वीज वितरण असे विभाग करून कामात सुसूत्रता आणली.
महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन कंपन्या एमएसईबीमधून तयार केल्या. यामध्ये 66 हजार कोटी रुपयांची कामे सुरू केली. मंत्री वळसे पाटलांनी या सर्व परिस्थितीचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून दहा कलमी कृती कार्यक्रम ठरवला. त्यांनी वीज क्षेत्रात केलेल्या कामांमुळे आज महाराष्ट्र भारनियमनमुक्तीकडे जात आहे.
मंत्री वळसे पाटलांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. महाराष्ट्र ज्ञान मंडळ म्हणजेच नॉलेज कार्पोरेशन ही संकल्पना, एमएससीआयटी कार्यक्रम यामुळे आधुनिक तंत्रज्ञान खेड्यापाड्यापर्यंत पोहोचविण्यात राज्य यशस्वी झाले आहे. एमकेसीएलमुळे राज्यातील अनेक तरुण संगणक साक्षर झाले. राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये यांना नॅककडून संस्थांचे आणि शिक्षण उपक्रमांचे प्रमाणीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यापीठे आणि महाविद्यालयांचा दर्जा वाढला. पुणे येथील इंजिनिअरिंग कॉलेजला स्वायत्तता देऊन त्याचा दर्जा वाढवला. आंबेगाव तालुक्यात अवसरी खुर्दजवळ नवीन शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले.
राज्यातील मागासवर्गीय मुला-मुलींचे उच्च शिक्षण मोफत केले. वळसे-पाटील यांच्यामध्ये राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि उद्योजक असे मिश्रण आहे. सध्याच्या शिक्षणात असलेले पुस्तकीज्ञान कमी करून जीवनात आणि व्यवसायात उपयोगी पडणारे विविध कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम त्यांनी आणले. वैद्यकीय शिक्षण प्रवेशप्रक्रिया नेहमी न्यायालयात जात असे. त्यांनी योग्य सरकारी धोरण राबवून विरोधकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय घेतला. आज वैद्यकीय शिक्षण प्रवेशप्रक्रिया एकदम सोपी आणि पारदर्शक झाली आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर तेथेही त्यांनी त्या पदाला साजेसे असे काम करुन दाखविले. आमदारांना शिस्त लावून विधानभवनाचे पावित्र्य राखण्याचे काम त्यांनी केले. विधानसभेत गदारोळ न होता जास्तीत जास्त वेळ प्रश्नांची मांडणी, चर्चा, विधायक निर्णय घेण्यात घालविण्यासाठी ते यशस्वी झाले. विधानसभेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यात अमृतमहोत्सवी कार्यक्रम घेतले. विधानसभेचे महत्त्व लोकांपर्यंत जावे यासाठी विशेष प्रयत्न केले.
आंबेगाव विधानसभा हा त्यांचा मतदारसंघ त्यांनी मागे ठेवला नाही. सन 1990 मध्ये ते प्रथम आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. तेव्हापासून सतत सात वेळा येथील प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाली. आंबेगाव तालुका प्रगतीत अग्रेसर राहावा असा त्यांचा सतत प्रयत्न असतो. अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालय, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, डिंभे धरण, शरद सहकारी बॅंकेची उभारणी, जलसिंचनाद्वारे हरितक्रांती, दुग्धव्यवसायात प्रगती अशी उल्लेखनीय कामे त्यांनी मतदारसंघात केली आहेत.
सत्तेची पदे भूषवणारे आणि सत्तेच्या आश्रयाने केवळ स्वतःचा आणि आपल्या गणगोताचा विकास साधण्यात मश्गुल असणाऱ्या राजकारण्यांमध्ये वळसे पाटील गणले जात नाहीत. स्वकर्तृत्वाने ते आपले लक्ष वेधून घेत आहेत. राजकारणात प्रवेश झाल्यापासून त्यांनी स्वतःची स्वच्छ प्रतिमा ठेवली. त्यामुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी गत विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील साहेबांना विक्रमी मताधिक्याने निवडून दिले.