मुंबई – ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांची केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत पाच तास बैठक झाली. कुस्तीपटू अनुराग ठाकूर यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी पोहोचले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत कुस्तीपटूंनी भाजप खासदार आणि कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसह 3 मागण्या मांडल्या. कुस्ती संघाची निवडणूक निष्पक्ष व्हावी, अशी मागणी कुस्तीपडूंनी केली. तसेच 28 मे रोजी पैलवानांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशीही मागणी त्यांनी केली.
अनुराग ठाकूर यांच्या भेटीपूर्वीच कुस्तीपटूंनी लैंगिक छळ प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेपेक्षा कमी काहीही स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले होते. कुस्तीपटू साक्षी मलिकने वृत्तवाहिनी बोलतांना सांगितले की, ‘सरकार आम्हाला काय प्रस्ताव देते ते बघू. ब्रिजभूषण यांना अटक करण्याची आमची प्रमुख मागणी आहे. सरकारचा प्रस्ताव आम्हाला पटला तर आम्ही खाप नेत्यांचा सल्ला घेऊ. तोपर्यंत सरकारचा XYZ प्रस्ताव आम्ही स्वीकारणार नाही. आम्ही आमचे आंदोलन संपवणार नाही.’
दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावले होते. अनुराग ठाकूर यांच्या निमंत्रणावरून कुस्तीपटू त्यांच्या भेटीसाठी आले होते. याआधी ३ जून रोजी म्हणजेच शनिवारी रात्री कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
यानंतर, 5 जून रोजी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट रेल्वेत आपापल्या नोकरीवर परतले. मात्र, महिला कुस्तीगीरांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे कुस्तीपटूंनी स्पष्ट केले होते.