मेलबर्न – भारतीय संघाच्या विजयात शुभमन गिल व महंमद सिराज यांनी आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला, या दोन खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल आहे, असा विश्वास कर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केला.
ऍडलेडमधील पहिल्या कसोटी पराभवानंतर दुसरा सामना खेळणे सोपे नव्हते. या दुसऱ्या सामन्यात आम्ही दणदणीत विजय मिळवला, यासाठी मला संपूर्ण संघाचा अभिमान आहे.
मी या विजयाचे श्रेय गिल व सिराज यांना द्यायला हवे. कारण पहिल्या सामन्यातील पराभवानंतर खेळणे सोपे नव्हते. त्यामध्येच या दोन्ही खेळाडूंचे पदार्पण होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड दडपण असेल. पण या दोघांनी सरस कामगिरी केली. या दोघांच्या कामगिरीचा वाटा विजयात नक्कीच मोलाचा आहे, असे रहाणेने सांगितले.
गिलने यावेळी सलामीला येताना पहिल्या डावात 45 धावांची खेळी साकारली, तर दुसऱ्या डावात नाबाद 35 धावा केल्या. सिराजनेही या सामन्यात भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दडपण ठेवले. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या गिल व सिराज यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.