पुणे – महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनच्या वतीने आणि पुणे जिल्हा ब्रीज असोसिएशन आणि पी.वाय. सी. हिंदू जिमखाना यांच्या सहकार्याने 39व्या सुहास वैद्य मेमोरियल महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेचे आयोजन पी .वाय सी . हिंदू जिमखाना येथे करण्यात आले आहे. या प्रसंगी उपस्थितांना संभदित करतांना जे. के. भोसले यांनी सांगितले की ब्रीज हा खेळ जोडीने खेळला जातो. त्यामुळे जिंकण्यासाठी दोघांना एकमेकांचे तोलामोलाचे सहकार्य मिळाले तरच ती जोडी जिंकते असा हा खेळ आहे. त्यामुळेच जोडीने मेहनत करून कसे पुढे जाता येते हे या खेळापासून शिकायला मिळते असे सांगितले.
यावेळी डॉ भाटे, आनंद सामंत यांनीही खेळाडूंना शुभेच्या दिल्या तर महाराष्ट्राचे सचिव हेमंत पांडे यांनी सांगितले की पी. वाय. सी. जिमखान्याने या राज्य स्पर्धेसाठी त्यांचा हॉल आणि इतर सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत याबद्दल त्यांचे आभार मानले.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्हाच्या एकूण 47 जोड्यांनी सहभाग नोंदवून फार चांगला प्रतिसाद दिला. त्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके प्राप्त केलेले राजू तोलानी,अशोक वैदय, कौस्तुभ बेंद्रे, अनिल पाध्ये, अजय खरे, अरुण बापट, राजेंद्र गोखले, मिलिंद आठवले, दीपक पोद्दार, हेमा देवरा, अलका क्षीरसागर अश्या दर्जदार खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे पुणेकरांना दर्जदार खेळ बघण्याची संधी प्राप्त झाली आहे. या 47 जोडयांमध्ये 8 बोर्डचे सात राऊंड खेळविण्यात येत आहेत.
याप्रमाणे आज खेळलेल्या पहिल्या चार राऊंडमध्ये पोद्दार हौसिंग या जोडीने सुंदर खेळ करून सर्वात जास्त 63 गुण मिळवून आघाडी मिळविली आहे तर त्यापाठोपाठ अकॅव्यारीयस, समाधान, बिन्द्रा, डॉक्टर, मॅंगो, आरजे आणि आय. टी. एस. आर. सी. या जोडयांनीही त्याखालोखाल गुण मिळवून अनुक्रमे दोन ते गो आठ क्रमांकासाठी आपली दावेदारी पेश केली. हे पूर्ण सात राऊंड संपल्यानंतर या 47 जोडयामधून पाहिले आठ संघ दुसऱ्या टप्यासाठी पात्र ठरणार आहेत. आणि त्यांच्यामध्ये पुन्हा स्वीस लीग सामने खेळविले जाणार आहेत.
तर पहिल्या आठ संघात स्थान न मिळालेल्या संघदरम्यान वेगळा गट करून त्यांच्यामध्ये आय. एम.पी. पेअर स्पर्धा खेळविली जाईल. या उर्वरित गटामध्येही खेळाडूंना जे गुण दिले जातील त्यानुसार या गटाचे विजेते आणि उपविजेते ठरविले जातील अशी माहिती महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष जे. के. भोसले आणि सरचिटणीस हेमंत पांडे यांनी दिली.
याप्रसंगी इंदोर येथे झालेल्या मागील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद मिळविल्यामुळे संघातील खेळाडू आर. के अगरवाल, राजेंद्र गोखले, मिलिंद आठवले, अनलं शहा, सुहास धाक्रस यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.