नवी दिल्ली – भारतीय संघाला जरी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय तसेच कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही भारतीय संघच बलाढ्य आहे, असे मत वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व माजी कर्णधार ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यांची मालिका गमवावी लागली. नव्या वर्षातील या पहिल्याच दौऱ्यात भारतीय संघाने टी-20 सामन्यांची मालिका 5-0 अशी जिंकून यजमान न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला होता. त्यानंतर मात्र भारताला एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत व्हाइटवॉश देत न्यूझीलंडने वचपा काढला होता. या संपूर्ण मालिकेत भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्वच क्षेत्रात अपयशी कामगिरी झाली. मात्र, तरीही लाराने कोहली आणि कंपनीची बाजू घेतली आहे.
भारतीय संघ गेल्या वर्षीपासून सातत्याने सामने खेळत आहे, त्यासाठी खूप प्रवासही करत आहे, अशा परिस्थितीत एखाद्या मालिकेत दर्जाला साजेशी कामगिरी होत नाही हेदेखील आपण समजून घेतले पाहिजे. पराभव किंवा विजय हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. त्यामुळे संघ पराभूत झाला की टीका करायची व विजेता बनला की कौतुक करायचे अशी दोन विरोधाभास करणे बरोबर नाही. याउलट संघाचे मनोधैर्य वाढविणे आवश्यक आहे. येत्या काळात भारतीय संघ या चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करेल असा मला विश्वास आहे, असेही लाराने स्पष्ट केले.