उमेश सुतार
कराड – महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यासह क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सभांनी गाजवलेले कराडच्या भाजीमंडईतील जनता व्यासपीठला सध्या व्यावसायिक, व्यापाऱ्यांचा विळखा पडला आहे. सभोवती झालेल्या कोंडीमुळे या व्यासपीठाचा श्वास गुदमरु लागला आहे.
जनतेला आपले मत मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी कराडमध्ये जनता व्यासपीठाची संकल्पना मांडण्यात आली. यावेळी सर्वसामान्य संघटनांच्या कार्यकर्त्यांसह दिग्गज नेत्यांनीही याच व्यासपिठावरुन आपली मते मांडली. सभा व जनता व्यासपीठ हे एक समीकरणच बनून राहिले. मात्र गत काही वर्षांपासून या व्यासपीठाला भाजी मंडईचा विळखा पडू लागल्याने या व्यासपिठाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या व्यासपिठाच्या इमारतीभोवतीच व्यावसायिक, व्यापारी पालिकेच्या आशीर्वादाने ठाण मांडून बसत असल्याने याठिकाणी मोठी कोंडी तर होतच असते. परंतु यामुळे या व्यासपिठाचा श्वासही गुदमरुन गेल्याचे चित्र दिसत आहे.
कराड नगरपालिकेने “स्वच्छ कराड, सुंदर कराड’मध्ये राज्यभर नावलौकिक मिळवला असला तरी कराडची ओळख असलेल्या तसेच पालिकेपासून शंभर फुटावर असलेल्या जनता व्यासपीठाला आयडियल बनविण्यासाठी पालिकेकडून कसलीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. आज जुनी मंडई नवी झाली तरीही या व्यासपीठा भोवतीचा विळखा सुटलेला नाही. त्यामुळे हे जनता व्यासपीठ मोकळा श्वास नेमका कधी घेणार? या प्रतिक्षेत नागरिक आहेत.
एकेकाळी या व्यासपिठावर कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्त्यांच्या सभा व्हायच्या, पुढे सर्व राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांच्या सभाही याच व्यासपिठावरुन संपूर्ण देशाने ऐकल्या व पाहिल्या आहेत. सध्या शहरात तालुक्यातील भाजी विक्रेत्यांची वाढती संख्या लक्षात घेवून नगरपालिकेने समोरील आवारात भाजी विक्रेत्यांसाठी 2010 मध्ये शिवाजी भाजी मंडई बांधली. मंडई इमारत बांधकामावेळी आतील व्यापाऱ्याना बाहेरील बाजूस बसण्यास परवानगी दिली. त्यांनी व्यासपीठ परिसरात आपले व्यवसाय थाटले. तर विक्रेत्यांसाठी कट्टे बांधण्यात आले. मात्र, बाहेर पडलेले विक्रेते व व्यापारी परत इमारतीत गेलेच नाहीत. त्यांनी व्यासपिठाभोवती थाटलेला व्यवसाय हटवलाच नाही. त्यातच व्यापारी व विक्रेत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत गेल्याने या व्यासपीठाभोवतीचा विळखा हळूहळू आवळत गेला.
मंडईच्या इमारतीतही कट्ट्यावर काही मोजक्याच व्यापाऱ्याना जागा देण्यात आली. तर कांदे बटाटे विक्रेत्यांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले. ज्यांना मंडई इमारतीमध्ये जागा मिळाल्या नाहीत, त्यांनी जनता व्यासपीठ इमारतीसमोर बसण्यास सुरूवात केली. या ठिकाणी पालिकेकडून भाजी विक्रेत्यांसाठी कट्टे व मच्छी विक्रेत्यांसाठी मच्छीमार्केट बांधून देण्यात आली आहे. मात्र, कराडची ओळख असलेल्या या जनता व्यासपीठ इमारतीबाबत कोणताच निर्णय घेतला जात नाही. केवळ जुजबी रंगरंगोटी करण्यात पालिकेला धन्यता वाटत आहे, यावरुनच पालिकेला या महत्वपूर्ण असलेल्या व्यासपीठाबाबत कितपत आस्था आहे, हे दिसून येत आहे.
दिग्गजांचा पदस्पर्श लाभलेली व राजकीय घडामोडीची साक्षीदार असलेली ही जनता व्यासपीठाची इमारत आजमितीस वापराअभावी बाजारकरूंच्या विळख्यात सापडली आहे. या व्यासपीठ इमारतीच्या खोलीत सध्या मंडई पोलीस चौकीचे कामकाज सुरु असून या कराडची ओळख म्हणून नावलौकिक असलेल्या या जनता व्यासपीठाला नवीन लूक कधी येणार? याकडे कराडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
गाजलेल्या सभांच्या आठवणी आजही ताज्या
या व्यासपीठावर दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी, समाजसेवक आण्णा हजारे, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकेकाळी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या सभा घेतल्या होत्या. त्या सभा त्या काळात चांगल्याच गाजल्या होत्या. त्या गाजलेल्या सभांच्या आजही अनेक जाणकार मंडळी आठवणी सांगत आहेत.