नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद करण्यासाठी मोदी सरकारकडून दबाव आणला गेल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी दिल्ली येथील दलित अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार व हत्या प्रकरणामध्ये मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
यानंतर त्यांनी याबाबतचा फोटो आपल्या ट्विटर खात्यावर पोस्ट केला होता. राहुल गांधींच्या या पोस्टवर, बलात्कार व हत्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची ओळख गुप्त ठेवण्यात येते. याचे राहुल गांधी उल्लंघन केले असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले.
यातच, ट्विटर खाते तात्पुरते निलंबित मुद्यावरून काँग्रेसने पुन्हा असा दावा केला की,’ ‘रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांच्या अकाऊंटवर अशीच कारवाई करण्यात आली आहे.’
काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे की,’अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह तसेच महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आली आहेत.’ असा दावा करण्यात आला आहे.
तत्पूर्वी, कॉंग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी राहुल यांचे ट्विटर हॅंडल ब्लॉक करण्यावरून प्रश्न उपस्थित केला होता. राहुल यांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अकाउंट बंद करण्यात आले आहे. तर मग हाथरस बलात्कार पीडितेच्या माता-पित्यांचा फोटो ट्विटरवर शेअर कऱणाऱ्या अमित मालवीय यांचे अकाउंट का बंद करण्यात आले नाही. नियम सर्वांसाठी सारखेच असावे असेही डॉ. शमा यांनी म्हटले. अमित मालवीय भाजपच्या आयटी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.