मुंबई – मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे सरकारकडे मदतीची मागणी करण्यात येत होती. तर विरोधकही आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली.
राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टीने 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं. एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर केल्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मदतीचं स्वरुप
जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर
ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल