बद्रिनाथ – चारधामपैकी एक बद्रिनाथचे प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठ गावात दोन दिवसांपासून भूस्खलन होत असून, हे संकट आता बद्रीनाथ यात्रेसाठीही अडथळा ठरू लागलं आहे. याठिकाणी पाचशेहून अधिक घरांना तडे गेले असून, आता पर्यंत अतिधोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या 50 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
जोशीमठ गावातील रस्त्यांना मोठमोठय़ा भेगा पडू लागल्या आहेत, तर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. तसेच सुमारे पाचशेहून अधिक घरांना तडे गेले आहेत. जमीन खचल्याने आणि भेगा पडल्याने चारधाम यात्रेच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेला धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठं महत्त्व आहे. चारधाम यात्रेमुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते आणि मोठा महसूल राज्य सरकारला मिळतो. दरम्यान, या यात्रेच प्रवेशद्वार असलेल्या ऋषीकेशमधील संत समाज आणि पुरोहित यांनी यात्रेच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केलीय.
यात्रेसाठी लवकरात लवकर पर्यायी मार्ग तयार करावा अशी विनंती सरकारकडे केली जात आहे. यामुळे 2023 ची चारधाम यात्रा सुरळीतपणे पार पडू शकेल. असं देखील त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, जोशीमठ येथे सुरू असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर प्रकल्पामुळेच गावाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी शुक्रवारी बंद पाळून प्रशासनाविरोधात असंतोष व्यक्त केला.