मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर आले आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामुळे तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका झाली आहे. दरम्यान, अश्यातच आता अनिल देशमुख यांना नागपूर व नवी दिल्लीत जाता यावे यासाठी चार आठवडे मुंबईबाहेर जाण्याची परवानगी विशेष सीबीआय व विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना दिली आहे.
“मी मूळचा नागपूरचा असल्याने आणि नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने काही कामांसाठी तिथे जाणे आवश्यक आहे. तसेच वकिलांची भेट घेऊन खटल्याबाबत सल्लामसलत करण्यासाठी नवी दिल्लीत जाण्याची आवश्यकता आहे.’ असे नमूद करत देशमुख यांनी ही परवानगी मागितली होती.
दरम्यान, जामिनाच्या आदेशांत उच्च न्यायालयाने देशमुख यांना अनेक अटी घातल्या असून न्यायालयाच्या परवानगीविना मुंबईबाहेर जायचे नाही, या अटीचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे देशमुख यांनी अॅड. अनिकेत निकम व अॅड. इंदरपाल सिंग यांच्यामार्फत दोन्ही न्यायालयात अर्ज केले होते.
1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.