मुंबई – गेल्या महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसून आले, तसेच टोकाचे मतभेद वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस होती. गेल्या दोन तीन दिवसात उघड आरोप-प्रत्यारोप झाले आणि आज हा वाद विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज होते. नाशिक विधान परिषद निवडणुकीत थोरात कुटुंबाविरोधात खूप मोठं राजकारण झालं, असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता.
तत्पूर्वी, या वादाला विधानपरिषद निवडणुकांमध्ये सत्यजित तांबे प्रकरणावरून तोंड फुटले होते. या निवडणुकीत नाना पटोले यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यासोबत कसं काम करायचं? असा प्रश्न थोरात यांनी पत्रात उपस्थित करत हायकमांडकडे तक्रार केली असल्याची चर्चा रंगली होती.
नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार फक्त बाळासाहेब थोरात यांनीच केली नाही. तर विदर्भातील काही कॉंग्रेसच्या नेत्यांनीही केलेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळाल्यानंतर नाना पटोले हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर त्यांची भूमिका ही वेगळ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची होती. मात्र आमच्या आग्रहानंतर कॉंग्रेसचा उमेदवार दिला आणि तो निवडून आला. अशा प्रकारची तक्रार विदर्भातील काही नेत्यांनी हायकमांडकडे केली होती.
दरम्यान, महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या नेत्यांचे गट-तट पाहायाला मिळतात. सध्या अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोन दिग्गजांचे मोठे गट आहेत. नाना पटोलेही आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी नाना पटोले यांची मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध इतर कॉंग्रेसचे नेते असा अंतर्गत संघर्ष वाढताना पाहायला मिळत आहे.
थोरातांनी लिहले होते पत्र…
“विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे,” अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी दिली होती. त्यानंतर आता थेट राजीनामा दिल्याने कॉंग्रेमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.