मुंबई – तब्बल एक वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर आता कुठं करोना संसर्ग आटोक्यात आला होता. त्यात लस आल्याने सर्वांच टेन्शन कमी झालं होतं. करोना प्रतिबंधक लसही संपूर्ण देशात देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्य निर्माण झालं होतं. मात्र आता करोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लादण्यात येईल, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
‘लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे. लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे,’ अशा आक्रमक शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाव्य लॉकडाऊनविषयी भाष्य केलं आहे.
दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
तत्पूर्वी नागपुरात सोमवारी 498 कोरोनाबाधित वाढलेत. शहरात तीन आणि ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. महत्वाचं म्हणजे काल 2 हजार सहाशे 35 चाचण्या झाल्या होत्या. यामध्ये 498 पॉझिटीव्ह आले असून त्याचे प्रमाण 18 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने कारवाई अजून तीव्र केली आहे.
अकोला जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालय, शिकवण्या बंद करण्यात आल्या आहेत. धार्मिक, राजकीय कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. तर वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तसा आदेश जारी केला आहे. वर्धा जिल्ह्याची कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता महाविद्यालये बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.