नवी दिल्ली – कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी हजारो लोक खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेत चालत होते. या यात्रेचे ठिकठिकाणी मोठे स्वागत झाले. त्यातून कॉंग्रेसची व राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारली असा निष्कर्ष बहुतेक जणांनी काढला आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप समारंभ आज राहुल गांधी यांच्या भाषणानंतर होणार आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू झाला होता. 145 दिवसांनंतर श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर यात्रेचा औपचारिक समारोप होणार आहे.
या समारोहासाठी देशातील काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांनी काल श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होत्या. या यात्रेचा समारोप कार्यक्रम आज पार पडणार आहे. यासाठी देशातील 21 विरोधी पक्षातील नेते एकत्र येणार आहेत.
यावेळी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रीय ध्वज फडकवतील त्यांनतर 11.30 वाजता सभेला सुरुवात होणार असून, यावेळी राहुल गांधी यांचं समारोप करणारं भाषणही होणार आहे. त्यामुळे राहूल गांधी भाषणादरम्यान काय बोलणार याकडे विरोधी पक्षातील नेत्यांचं देखील लक्ष लागून आहे. राहुल गांधींची ही यात्रा जवळपास 3570 किलोमीटरची होती.