पुणे – करोनामुळे शहरामध्ये रात्री संचारबंदी लागू केल्यानंतरही अनेक व्यक्ती विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा 85 नागरिकांविरुद्ध पोलिसांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मास्क परिधान न करणाऱ्या 2 हजार 162 जणांवर मागील दोन दिवसात पोलिसांनी कारवाई केली आहे.
संबंधित संचारबंदीत नागरिकांनी कोणत्याही सबळ कारणाशिवाय फिरण्यास मनाई आहे. असे असूनही काही नागरिक शहरामध्ये विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. रात्री वेगवेगळ्या भागांत केलेल्या नाकेबंदीच्या ठिकाणी असे प्रकार आढळून आले आहेत. संबंधित व्यक्तींना समज देऊन सोडल्यानंतरही ते ऐकत नसल्याने पोलिसांकडून अशा व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
रात्रीच्या संचारबंदीच्या पहिल्या दोन रात्री शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या काही जणांवर कारवाई करण्यात आली होती. सोमवारी -21, तर मंगळवारी 64 असे एकूण 85 जणांवर पोलिसांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा