अमरावती – राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली होती.
या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाचा आज निकाल आला असून बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यपद रद्द करा, अशी मागणी याचिकाकर्ते तिरमारे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता बच्चू कडू उच्च न्यायालयात जाणार आहेत. तसेच कोर्टाने दिलेल्या चुकीच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी आपल्याला जामीन मिळाला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता. मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
राज्य शासनाने आमदारांची एक सोसायटी गठीत करून घरासाठी कर्ज दिले होते. हेच ते घर असून 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जावर या घरासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम आम्ही नोंदवली होती. मात्र घर क्रमांक देण्यास विसरलो होतो. हा संपूर्ण प्रकार अचलपूरला घडला आणि या प्रकरणाची तक्रार चांदूर बाजार येथील व्यक्तीने आसेगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने वचपा काढण्यासाठी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते, असे ते म्हणाले.