पुणे -केंद्र शासनाने शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे. राज्यातील 31 हजार 72 उमेदवारांची “टीईटी’ प्रमाणपत्रांची सात वर्षांची मुदत संपली आहे. त्यामुळे यातील बहुसंख्य उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न भंग झाले आहे.
“एनसीईआरटीने’ 2012 नंतर शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याची अट घातली होती. राज्य शासनाने वर्षातून दोन वेळा “टीईटी’ परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. प्रत्यक्षात मात्र वर्षातून एकदाच ही परीक्षा घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा घेण्यात आल्या. आतापर्यंत “टीईटी’च्या सहा वेळा परीक्षा झाल्या असून, या परीक्षेमध्ये एकूण 82 हजार 298 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेच्या पेपर 1 मध्ये 42 हजार 713 व पेपर 2 मध्ये 43 हजार 585 उमेदवार उत्तीर्ण झाले आहे.
राज्यात 15 डिसेंबर 2013 रोजी पहिली “टीईटी’ परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पेपर-1 साठी 3 लाख 83 हजार 630, तर आणि पेपर-2 साठी 2 लाख 35 हजार 761 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यात एकूण 31 हजार 72 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. या परीक्षेचा निकाल मे 2014 मध्ये जाहीर झाला होता. निकालाचे प्रमाणपत्र हे निकालाच्या तारखेपासून सात वर्षांसाठी पात्र ठरणार असल्याचेही केंद्र शासनाने नमूद केले होते. त्यामुळे पहिली परीक्षा दिलेल्या उमेदवारांची मुदत 1 मे 2021 रोजी संपली आहे. त्यामुळे या उमेदवारांना शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळण्याची स्वप्न आता धुळीला मिळालेली आहे.
राज्यात 2012 नंतर शिक्षक भरतीला बंदी होती. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने शिक्षक भरतीवरील बंदी उठवली. शिक्षक भरती पारदर्शकपणे व्हावी, यासाठी पवित्र पोर्टल प्रणाली विकसित केली असून, या प्रणालीमार्फतच पहिल्या टप्प्यात 12 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णयही शासनाने जाहीर केला होता. मात्र, या भरतीत 6 हजार उमेदवारांना शाळांमध्ये नोकऱ्या मिळालेल्या आहेत. उर्वरित जागांसाठीची भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
पूर्वी अर्ज केलेल्यांना अडचण नाही
पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रक्रिया ही पूर्वीच झालेली आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया ही राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांना “टीईटी’ प्रमाणपत्राची मुदत संपली असली तरी त्यांना या भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, भविष्यात होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या उमेदवारांना अडचणी येण्याची शक्यता आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
“टीईटी’ प्रमाणपत्रांची मुदत वाढवून देण्याबाबत अनेकदा उमेदवारांकडून आंदोलने करून राज्य शासनाकडे मागणी केली होती. मात्र, शासनाकडून याची गंभीर दखल घेतली नाही. “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या व बोगस प्रमाणपत्र दाखल करून काही जणांनी शाळांमध्ये नोकऱ्या मिळविलेल्या असतानाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही हा शिक्षण विभागाचा अजब कारभाराचा उत्तम नमुनाच म्हणावा लागणार आहे.
– विठ्ठल सरगर, शिक्षक उमेदवार प्रतिनिधी