नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांना संक्रमण साखळी तोडण्यासाठी आक्रमक उपाययोजना करण्यावर आणि मृत्युदर1 टक्क्याखाली ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
या ठिकाणी चाचण्यांचे प्रमाण वाढवणे, मृत्युदर कमी राखण्यासाठी प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन आणि प्रभावी देखरेखीसह जीव वाचवण्याच्या सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये गेल्या 24 तासांत राष्ट्रीय स्तरावर नोंदल्या गेलेल्या रुग्णांपैकी 46 टक्के सक्रिय रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात नोंद झालेल्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 22 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या 24 तासांत देशभरात झालेल्या कोविड मृत्यूंपैकी 52 टक्के मृत्यू या तीन राज्यांमध्ये झाले आहेत.
देशात गेल्या 24 तासांत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी एकट्या महाराष्ट्रात 35 टक्के मृत्यू झाले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रत्येक राज्यातील चिंता वाढवणारे जिल्हे निश्चित केले आहेत. महाराष्ट्रात, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा आणि पालघर हे जिल्हे अधोरेखित करण्यात आले असून या ठिकाणी प्रभावी नियंत्रण आणि संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याच्या गरजेवर भर देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशात, प्रकाशम आणि चित्तूर हे चिंता वाढवणारे जिल्हे आहेत. कर्नाटकात, कोप्पल, म्हैसूर, दावणगेरे आणि बेल्लारी या जिल्ह्यांत आरटी-पीसीआर चाचणी सुविधांचा चांगल्या प्रकारे उपयोग करावा, घरोघरी जाऊन सक्रिय रुग्णांचा शोध घेण्याचा आणि त्यांच्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्याची सूचना करण्यात आली आहे.