मुंबई – भारतीय संघाचा जागतिक दर्जाचा फलंदाज विराट कोहली जरी सातत्याने अपयशी ठरत असला तरीही त्याने ब्रेक घेऊ नये. त्याने जर वैयक्तिक कामगिरीवर निराश होत ब्रेक घेतला तर ते त्याच्या कारकीर्दीसाठी धोकादायक ठरेल, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अन्य काही माजी क्रिकेटपटूंनी कोहलीला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या सगळ्यांच्या विरुद्ध सल्ला गावसकर यांनी दिला आहे.
कोणताही खेळाडू अपयशी ठरत असेल तर त्याने खेळतच राहिले पाहिजे, कारण तो जर खेळलाच नाही तर त्याला यश कसे मिळेल. ब्रेक घेऊन घरी बसला तर त्या खेळाडूला सरावही करता येणार नाही व अपयशातून मार्गही काढता येणार नाही. कोहली अपयशी ठरत आहे हे स्पष्ट दिसत आहे पण त्याने यातून बाहेर येण्यासाठी ब्रेक घेणे हा उपाय होऊ शकत नाही, असेही गावसकर म्हणाले. कोहलीने भारतीय संघाकडून खेळताना ब्रेक घेऊ नये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याने देशाकडून खेळण्याला जास्त प्राधान्य दिले पाहिजे.
आयपीएल स्पर्धेतून त्याने काही सामने न खेळण्याचा निर्णय घेतला तर त्याचे मी समर्थन निश्चितच करीन पण तो जर खेळत राहिला तरच त्याच्या धावा होतील व धावा झाल्या की त्याचा आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास वाढला तर त्याची मोठी खेळीही साकार होईल, असा विश्वासही गावसकर यांनी व्यक्त केला.