भोर -करोनामुळे राज्य दि. 22 मार्च पासून लॉकडाऊन झाल्याने तेव्हापासून शुक्रवार (दि. 22) असे तब्बल दोन महिने भोर आगाराच्या एसटी बसेस जागेवरच होत्या. अखेर शनिवारी (दि. 23) तालुक्यांतर्गत सेवा सुरू केली, पण दिवसभरतात 367 किमी एसटी धावली व उत्पन्न केवळ 310 रुपये मिळले. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसादामुळे सेवा बंद करण्यात आली असून ती केव्हा पूर्ववत होईल हे आता सांगने कठीण असल्याचे आगारप्रमुख बी. एम. सूर्यवंशी यांनी सांगितले.
भोर आगारातून शनिवारी (दि. 23) तालुक्यातील पांगारी, मळे, चिखलगाव, महूडे या चार गावांसाठी सकाळी 10.30 वाजता बसेस सोडण्यात आल्या. वाहतूक नियंत्रक शरद गायकवाड, विजय मोरे, नितीन शिर्के यांनी ही वाहने सोडली. मळे, पांगारी या मार्गावर जाताना सात प्रवाशांनी तर येताना दोन प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला. दरम्यान, शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व एसटी बसेसचे निर्जंतुकीकरण केले असून चालक-वाहक, प्रवासी यांना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे शरद गायकवाड व विजय मोरे यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात प्रशासनाने नियम शिथिल केल्याने भोर आगाराने शनिवारपासून एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पहिल्या दिवशी केवळ नऊ प्रवाशांनी प्रवास केल्याने खर्चाचे आणि उत्पन्नाचे गणित लावणे अवघड होणार झाले आहे. आधीच दोन महिन्यांचा तोटा त्यात अल्पसे उत्पन्न यामुळे हे गणित अवघड जाणार आहे. त्यामुळे बस जागेवरच उभे करणे योग्य असल्याचे बोलले जात आहे. तरी आता शासनाचा आदेश काय येतो त्यावर एसटीचे भवितव्य अंवलबून आहे.