गुवाहाटी – आसाममधील नाव दुर्घटनेनंतर 87 प्रवाशांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले. त्या दुर्घटनेत एक महिला मृत्युमुखी पडली. तर, दोन प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत.
आसाममध्ये बुधवारी ब्रह्मपुत्रा नदीत दोन नावांची धडक झाली. त्या धडकेनंतर 90 प्रवाशांना घेऊन जाणारी नाव नदीत उलटली.
त्यामुळे अनेक प्रवासी बेपत्ता झाले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने शोध आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. रात्रभर ते सुरू राहिले. त्यामुळे बहुतांश प्रवाशांना वाचवण्यात यश आले. बचाव कार्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलांची पथके सहभागी झाली.
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वासर्मा यांनी गुरूवारी दुर्घटना घडली त्या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचा आदेश दिला.