नवी दिल्ली – केंद्र सरकार बीपीसीएल कंपनीचे आपल्याकडील सर्व भाग भांडवल विकणार आहे. मात्र, त्याअगोदर कर्मचाऱ्यांना शेअरच्या किमतीच्या एकतृतीयांश किमतीमध्ये शेअर खरेदी करण्याचा पर्याय कंपनी उपलब्ध करून देणार आहे.
बीपीसीएल कंपनीच्या एका ट्रस्टमध्ये कंपनीचे 9.33 टक्के भाग भांडवल आहे. यातील 2 टक्के शेअर कर्मचाऱ्यांना उपलब्ध केले जाणार असल्याचे वृत्त आहे. केंद्र सरकार आपल्याकडील सर्व 52.98 टक्के शेअर विकणार आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे शेअर हे बीपीसीएलच्या ट्रस्टमधील असल्यामुळे सरकारच्या शेअरच्या प्रमाणात काही फरक पडणार नाही. कंपनीच्या संचालकांपासून कर्मचाऱ्यापर्यंत हे शेअर एक तृतीयांश किमतीत उपलब्ध केले जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांना शेअर विकत घेतल्यानंतर ते एक वर्ष विकता येणार नाहीत. गेल्या महिन्यात बीपीसीएलने कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीची योजना जाहीर केलेली आहे. या कंपनीचे खासगीकरण होताना कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त लाभ करून देण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे. सरकारला या वर्षी निर्गुंतवणुकीमधून 2.1 लाख कोटी रुपये उभे करायचे आहेत. यासाठी बीपीसीएलची विक्री आवश्यक असल्याचे समजले जाते.