नवी दिल्ली – आधुनिक जगातील नव्या पिढीसाठी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ही रिलेशनशिप किंवा साधी मैत्री हे काही नवीन राहिलेले नाही. अशा प्रकारच्या रिलेशनशिप किंवा मैत्रीपाठोपाठ ब्रेकअप सुद्धा अनेक वेळा येतो. अशा प्रकारच्या रिलेशनशिपची आणि ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर सुद्धा रंगत असते. आता नुकताच सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ब्रेकअप नंतर संबंधित जोडप्यातील बॉयफ्रेंडला आर्थिक नुकसानभरपाई मिळाली आहे.
प्रतीक आर्यन नावाच्या एका सोशल मीडिया युजरने हा मेसेज पोस्ट केला असून त्यामध्ये या प्रेमाच्या आगळ्यावेगळ्या कराराची माहिती त्याने दिली आहे. प्रतीकने दिलेल्या माहितीप्रमाणे त्याने आणि त्याच्या गर्लफ्रेंडने एक करार केला होता. या कराराप्रमाणे दरमहा दोघांनाही एका जॉईंट अकाउंटमध्ये 500 रुपये भरायचे होते. त्यानंतर जर दोघांच्या रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाले तर या ब्रेकअपला जो जबाबदार आहे त्याने दुसऱ्या जोडीदाराला आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे या करारात म्हणण्यात आले होते.
याप्रमाणे या दोघांनी दरमहा 500 रुपये याप्रमाणे एका जॉईंट अकाउंटमध्ये भरले होते. काही कालावधीनंतर प्रतीकचा ब्रेक-अप झाला आणि त्याला जबाबदार त्याची गर्लफ्रेंड असल्यामुळे या हार्टब्रेक इन्शुरन्स फंडच्या कराराप्रमाणे त्याला 25 हजार रुपयाची आर्थिक नुकसान भरपाई मिळाली. प्रतिकने या आगळ्यावेगळ्या कराराची आणि हार्ट ब्रेक इन्शुरन्स फंडची माहिती सोशल मीडियावर शेअर करताच त्याला मोठ्या प्रमाणावर लाईक मिळाले.
अनेकांनी अशा प्रकारच्या हार्ट ब्रेक इन्शुरन्स फंडचे स्वागत केले आहे; पण अशा प्रकारच्या हार्ट ब्रेकला जबाबदार कोण हे ठरवणार कोण असा प्रश्नही काही लोकांनी उपस्थित केला आहे.अनेक वेळा जेव्हा रिलेशनशिपमध्ये ब्रेकअपची प्रक्रिया होते तेव्हा दोघेही एकमेकांना जबाबदार धरत असतात. अर्थात सध्या तरी प्रतिकने शेअर केलेल्या या मेसेजची आणि त्यावरील प्रतिक्रियांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.