कोलकाता -दुकानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. त्याची अंमलबजावणी झाली तर चीनमधून भारतात होणाऱ्या 17 अब्ज डॉलरच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो, असा दावा व्यापारी संघटनेने केला आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ या संघटनेने म्हटले आहे की, देशातील सर्व व्यापाऱ्यांच्या मनामध्ये चीनबाबत असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापारी स्वतः होऊन चिनी वस्तूंचा व्यापार टाळू लागले आहेत. चीनमधून खेळणी, घरगुती उपकरणे, मोबाइल, इलेक्ट्रिक उपकरणे, सौंदर्यप्रसाधनांची साधने अशा प्रकारच्या 17 अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात केली जाते. व्यापाऱ्यांनी जर ही आयात थांबविली तर या चीनवर परिणाम होऊ शकतो असे या संघटनेचे महासंचालक विवेक बन्सल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमची संघटना व्यापाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले. कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेनेही भारतीय सन्मान, हमारा अभिमान हे अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत या संघटनेने आपल्या सदस्यांना चिनी वस्तूंचा व्यापार करू नका, असे सांगितले आहे. त्याचबरोबर ग्राहकांनाही चिनी वस्तू खरेदी करू नका असे आवाहन केले आहे.
या संघटनेने 3,000 वस्तूंची यादी जाहीर केली असून या वस्तूंची आयात थांबवून त्याला देशांतर्गत पर्याय निर्माण केला जाऊ शकतो असे म्हटले आहे. त्याचबरोबर या संघटनेने सेलिब्रिटीजना चिनी वस्तूंच्या जाहिराती करू नका, असे आवाहन केले आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळाने ई-कॉमर्स कंपन्यांनी चिनी वस्तू आयात करून त्या भारतीय ग्राहकांना देऊ नये, असे आवाहन केले आहे. सरकारनेही पुढाकार घेऊन ई-कॉमर्स कंपन्यांना याबाबत सूचना करावी, अशी विनंती केली आहे.