नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी चीनवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सतत कुरापती करणाऱ्या चीनला कठोर संदेश देण्याची गरज आहे. त्यासाठी त्या देशावर बहिष्कार टाकला जावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
चीनकडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली जाते. त्या कुरापतींनंतरही चीनबरोबरच्या भारताच्या व्यापारात वाढ झाली आहे. भारताने 2020 या वर्षात चीनमधून 65 अब्ज डॉलर्स किमतीच्या मालाची आयात केली. आयातीची रक्कम 2021 या वर्षात 95 अब्ज डॉलर्सवर पोहचली. म्हणजेच चीनबरोबरच्या व्यापारात थेट 50 टक्क्यांनी वाढ झाली.
आपण चीनला आणखी श्रीमंत का बनवत आहोत? आपल्या पैशांतून ते आपल्याच विरोधात लढण्यासाठी शस्त्रे खरेदी करतात आणि सैन्य मजबूत करतात. त्यामुळे चीनबरोबर व्यापार सुरू ठेवणे अयोग्य आहे. त्या देशाकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू आपण आपल्याच भूमीत बनवू शकतो, असे केजरीवाल यांनी म्हटले. ते प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.