नवी दिल्ली – भारतीय मुष्टियुद्ध महासंघाने या महिन्यापासून सराव शिबिर सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश दिला जाणार असून पतियाळातील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात (साइ) हे शिबिर होणार आहे.
देशात करोनाचा धोका वाढल्यानंतर सर्व शिबिरे बंद करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून खेळाडूंना सरावही करता आलेला नाही. सांघिक सरावाला परवानगी नव्हती. मात्र, आता ठरावीक खेळाडूंना करोनाबाबतची सर्व काळजी घेत सराव करण्यासाठी महासंघाने तयारी केली आहे. त्यातच आगामी काळात ऑलिम्पिक पात्रतेच्या ज्या स्पर्धांमध्ये खेळाडू सहभागी होणार आहेत त्यांनाही या शिबिरात सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार आहे.