दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी विशेष मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 123 जणांवर कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांवर खटला दाखल करून न्यायालयात पाठविण्यात येते. न्यायालय अशा वाहन चालकांना अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी करते. तसेच काही वाहन चालकांचा वाहन चालविण्याचा परवानाही न्यायालयाकडून रद्द केला जातो.
पिंपरी – वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचे पोलीस नंबर टिपून घेतात. त्यानंतर त्यांना दंड भरण्यासाठी पत्रही पाठवितात. मात्र या पत्राकडे अनेकजण दुर्लक्ष करून दंडही भरत नाहीत. अशा वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबविली असून दोन दिवसांमध्ये 623 वाहन चालकांकडून दंड वसूल केला आहे.
सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट जाणे, नो-एन्ट्रीतून जाणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, सीट बेल्ट न वापरणे, हेल्मेट न घालणे, अशा प्रकारे वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचा भंग केला जातो. यापैकी काही वाहनचालकांकडून जागेवरच दंड वसूल केले जात नाही. त्यांच्या वाहनांचे नंबर पोलीस टिपून घेतात आणि नंतर त्या वाहन मालकाला पत्र पाठवून दंड भरण्यास सांगितले जाते. नागरिकांचा वेळ वाचावा, असा त्यामागचा हेतू असतो. मात्र बहुतांश वाहन चालक पोलिसांनी पाठविलेल्या पत्राकडे दुर्लक्ष करीत दंड भरत नाहीत. अशा वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यासाठी साहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी शनिवार (ता. 10) आणि रविवारी (ता. 11) विशेष मोहीम राबविली.
“”पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक पोलिसांच्या दहा चौक्या आहेत. प्रत्येक पोलीस चौकीच्या हद्दीत एक याप्रमाणे दहा पथकांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. या नाकाबंदीत ज्या वाहन चालकांना दंड आकारला आहे, मात्र त्याने तो भरलेला नाही, अशा 623 वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. यापुढील काळातही अशाच प्रकारे कारवाई करण्याचे नियोजन आहे.”
प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक – वाहतूक नियोजन विभाग