नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आतापर्यंत १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून उत्तर प्रदेश पोलिसांतर्फे आतापर्यंत १,१०० लोकांना अटक व ५५५८ लोकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप, अपर्णा सेन व अन्य कलाकारांच्या समूहाने उत्तरप्रदेशमध्ये भडकलेल्या या हिंसेची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व्हावी असं पत्र न्यायालयाला लिहलं आहे. या पत्रामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे अथवा विध्वंसक कृत्यांचे समर्थन करत नाही मात्र राज्यामध्ये नागरिकांच्या शांततेने आंदोलन करण्याच्या अधिकारावर गदा आणली गेली असल्याचं म्हंटलं आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर व अभिनेता झीशन अय्युब यांनी हे पत्र माध्यमांसमोर वाचून दाखवले. या पत्राद्वारे उत्तर प्रदेश सरकारवर गंभीर आरोप लावण्यात आले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंसक वक्तव्यांमुळेच पोलिसांना एका विशिष्ट समुदायाविरोधात कारवाई करण्याची व त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्याची मुभा मिळाली असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवणे, अपर्णा सेन, अलंकृता श्रीवास्तव, कुब्रा सैत, मल्लिका दुआ, कोंकणा सेन-शर्मा, स्वरा भास्कर व झीशन अय्युब या बॉलिवूडमधील प्रसिद्ध हस्तींनी या पत्रावर सह्या करत उत्तर प्रदेश हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.