पुणे -करोना आणि लॉकडाऊनचा पुस्तक प्रकाशनावर परिणाम झाला आहे. लेखकांकडून विविध प्रकारचे साहित्य निर्मिती होत आहे. मात्र, छपाई आणि तांत्रिक बाबींमुळे पुस्तके प्रकाशित होण्यास मर्यादा येत आहेत. यामुळे प्रकाशकांनी ई-बुक निर्मितीचा पर्याय स्वीकारला आहे. तर, पुस्तकांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्याची मागणी जोर धरत आहे.
लॉकडाऊनमुळे जवळपास 5-6 महिने पुस्तक व्यवसायावर परिणाम झाला आहे. या क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मागील काही महिन्यांपासून प्रकाशन क्षेत्र सुरळीत होत होते. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाला. यामुळे पुन्हा हे क्षेत्र कचाट्यात सापडले आहे. पुस्तकांची वाढती गरज, महत्त्व आदीच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्याची मागणी होत आहे. याबाबत अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र देण्यात येणार आहे.
कागद हा विषाणूंचा वाहक नाही हे जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुस्तकांची विक्री करण्यात कोणती अडचण येऊ नये. पण सध्या पुस्तकांची दुकाने आणि ग्रंथालय बंद असल्याने प्रकाशकांना पुस्तके विकणे आणि पुस्तक प्रेमींनी विकत घेणे या दोन्ही गोष्टी ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे पुस्तकांचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करावा, असे राजीव बर्वे आणि दत्तात्रय पाष्टे यांनी पत्रात नमूद केले आहे.
ग्रंथालय खूप दिवस बंद आहेत. सगळ्यांना पुस्तक घेऊन विकत घेऊन वाचणे शक्य होत नाही, असा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे हे विचारात घेणे गरजेचे आहे. पुस्तक निर्मितीमध्ये असणारे डीटीपी ऑपरेटर्स, मुद्रितशोधक, चित्रकार अशा अनेक घटकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. प्रकाशन व्यवसाय हा साखळी व्यवहार असल्याने अनेक घटक भरडले जात आहेत. मागील लॉकडाऊनमध्ये व्यवसायाचे कंबरडे मोडले होते. तर आता प्राण कंठाशी आले आहेत, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे सरकारने या स्थितीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
– प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद
चांगल्या दर्जेदार पुस्तकांची निर्मिती ही लेखन आणि संपादनाच्या दृष्टीने थांबलेली नाही. पण पुढच्या तांत्रिक बाबींमुळे ज्यात मुद्रण, बांधणी, वितरक आणि विक्री या गोष्टी येतात. या लॉकडाऊनमध्ये ठप्प झाल्याने पुस्तके ही प्रतींच्या स्वरुपात वाचकांपर्यंत पोहोचवणे कठीण झाले आहे. मात्र प्रकाशनाच्या ऍपच्या सहाय्याने ई-बुकमध्ये रुपांतरित झालेली पुस्तके वाचकांना उपलब्ध होत आहेत. याबाबत प्रकाशकांच्या संघटनेने पुस्तक विक्री ही जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीप्रमाणे मानली जावी, या संदर्भात अर्ज केला आहे.
– डॉ. सदानंद बोरसे, संपादक, राजहंस प्रकाशन