संतोष पवार
सातारा -करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दि. 15 जूनला शाळा सुरु होणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्याच्या सर्वच भागात असल्याने सद्यस्थितीत शाळा सुरु होतील, अशी शक्यता वाटत नाही. शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पुस्तके प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोहोच केली असली तरी करोनाच्या धास्तीने सरकार शाळा सुरु करण्याबाबत काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थी, पालकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधितांचा आकडा सातशेच्यावर गेला आहे. 32 नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. अशी भयावह परिस्थिती आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने शाळा कोणत्या पध्दतीने सुरु करता येतील याचा अभ्यास सुरु केला आहे. कमी पटाच्या शाळा सुरु करण्यावर सरकारचा जोर आहे. याशिवाय कंटेनमेंट झोन सोडून अन्य ठिकाणच्या शाळा दोन टप्प्यांत सुरु होतील का? यावरच विचार विनिमय सुरु आहे.
एक दिवस मुले, एक दिवस मुली असाही विचार सुरु आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रश्नावली दिली होती. शिक्षकांची भूमिका शाळा सुरु व्हाव्यात अशीच आहे. मात्र पालक प्रतिनिधी, गावातील प्रमुख व्यक्तींचे याबाबत एकमत होताना दिसत नाही. बऱ्याच शाळांमध्ये विलगीकरण कक्ष करण्यात आल्याने आवश्यक त्या उपाययोजना करुन शाळा सुरु करण्यावर अनेकांनी भर दिला आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनीही शाळा सुरु करण्याची घाई नको, सरकारचे निर्देश येऊ द्या असे शिक्षण विभागाला सांगितले आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने मात्र शाळा सुरु करण्याबाबत अनेक पर्याय पुढे असून त्यावर विचार होत असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक यांना मुख्यालयाच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले असून शाळांची स्वच्छता करणे, शाळा व्यवस्थापन समितीची मिटींग घेणे, विद्यार्थ्यांना पुस्तके वाटणे अशी कामे शिक्षकांना लावली आहेत. कंटेंनमेंट झोन वगळता सर्व शाळात शिक्षक दाखल व्हायला सुरुवात झाल्याने शाळा सुरु होतात की काय अशी उत्कंठा विद्यार्थी, पालकांना लागून राहिली आहे. सर्व तालुक्यांत 94.59 टक्के पुस्तके पोहोचली आहेत.
उर्वरित पुस्तकेही लवकरच पोहोचवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. एकंदर शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याबाबतची प्रक्रिया राबवली असली तरी सद्यस्थितीत शाळा सुरु करणे धोकादायक आहे. केंद्र सरकारने जुलै महिन्यात शाळा सुरु करण्यावर विचार करु असे म्हटले आहे. राज्य सरकार जूनमध्ये सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 30 जूनपर्यंत शाळा सुरु होईल, असे वाटत नाही. अशा परिस्थितीत पालक, विद्यार्थी यांच्या नजरा सरकारच्या निर्णयाकडे लागून राहिल्या आहेत.