उत्तम पिंगळे
मी ः सर नमस्कार.
विसरभोळे ः हं नमस्कार…
मी ः काय सर, लक्ष कुठे आहे?
विसरभोळे ः अरे या… या… कालच नातवाच्या दुसरीची पुस्तके व गणवेश घेण्यासाठी गेलो होतो. त्याचं बिल पाहत आहे, पुस्तके व गणवेशाचा खर्च किती झाला.
मी ः महागाईच एवढी वाढली आहे तर काय करणार?
विसरभोळे ः महागाई तर आहेच, पण दरवर्षी नवी पुस्तके व नवा गणवेश मला तर काही समजत नाही.
मी ः आता सर्व बदलत चालले आहे.
विसरभोळे ः अगदी 30-40 वर्षांपूर्वी आमच्या काळात नवी पुस्तके परवडतच नसत.तसे जरी ती परवडली तरी आपल्यानंतर आपले भावंडं किंवा नातेवाईक वा अगदी शेजार-पाजाऱ्यांसाठी ठेवले जाई.
कित्येकदा माझ्या मोठ्या भावाची पुस्तके त्याचे वर्ष संपल्यावर माझ्या मावसभावाला दिली जात व त्याच्यानंतर माझ्याकडे येत असत. असा पुस्तकांचा प्रवास किती वेळा झाला आहे.
गणवेशाच्या बाबतीतही तेच आहे. मी तर माझ्या मोठ्या भावाचे कपडे घातले आहेत अगदी पिना वगैरे लावून. आताच्या मुलांना ते आवडेल का?
मी ः निश्चितच नाही, पण आता लोकांना नवीन घेणे परवडत आहे म्हणून हे होत आहे. तसेच आपल्या घरचे नातेवाईकही जुने गणवेश घेत नाहीत. म्हणून एकूणच हा गणवेश व पुस्तके खर्च वाढतच चालला आहे.
विसरभोळे ः आता तोही व्यवहार होत चालला आहे. कित्येक शाळेत पुस्तके दिली जातात विशेषतः सीबीएसई वगैरे शाळांत. बाहेर ती पुस्तके सहज मिळत नाहीत व जुनी वापरू दिली जात नाहीत. अशा शाळांमध्ये ठेकेदारांना कंत्राट दिले जाते. ते ठेकेदारच रिझल्ट घोषित होताना व प्रवेशाच्या वेळी आपले स्टॉल तेथे मांडतात. पालकांना मग नाईलाजाने तेथे खरेदी करावी लागते. एकीकडे शाळेत पर्यावरणाचे धडे देत असताना शाळांनी मुलांना पुस्तके काळजीपूर्वक वापरावयास सांगायला हवीत तसेच ती पुस्तके माफक किमतीत विकत घेऊन दुसऱ्या विद्यार्थ्यांना ती माफक किमतीत दिली जावीत त्यामुळे सर्वांचाच फायदा होईल व पर्यावरणाचाही फायदा होईल. शाळेने त्यात पुढाकार घ्यायला हवा.
गणवेशाचे तर विचारूच नका. विशिष्ट दुकाने विशिष्ट शाळांसाठी गणवेश ठेवत असतात. मग विद्यार्थ्यांना त्याच दुकानातून ते घ्यावे लागतात. तसेच शाळाही मधून मधून स्वतःचे गणवेश बदलत असतात. आमच्या वेळी शाळांचे गणवेश सहसा बदलत नसत. मग मोठ्या भावाचे कपडे छोट्या भावाला व मोठ्या बहिणीचे कपडे छोट्या बहिणीला होत असत. गणवेशाचा प्रवास अगदी नातेवाईकांकडेही बिनदिक्कत होत असे. तसे कुणी नसले तर नोकरदारांच्या मुलांसाठी ते दिले जात असत.अशामुळे त्या मंडळींचा नवीन गणवेशावरील खर्च कमी होत असे. आता तर सर्वच बदलले आहे. शाळा सुरू झाल्या की गणवेश, पुस्तके, स्टेशनरी यांचे मोठे मार्केटच चालू होते. कित्येक घरात आपण पाहतो की, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, रबर अशा वस्तूंचे खच पडलेले असतात. लोकांकडे खूप पैसा आला आहे व त्यांना स्टेटस हवे आहे त्यामुळे आपोआपच असे मार्केट फोफावत जाते.