माधुरी तळवलकर
भारती ठाकूर, निवेदिता खांडेकर आणि उषःप्रभा पागे या तिघींनी मिळून नर्मदा नदीची परिक्रमा केली. ही परिक्रमा फक्त केवळ एक भाविक म्हणून पुण्य कमावण्यासाठी त्यांनी केलेली नाही. वेगळ्या वातावरणात, वेगळ्या प्रदेशात माणसे कशी राहतात, तिथली भौगोलिक स्थिती काय आहे, सामाजिक, शैक्षणिक सुविधा कशा आहेत यातही त्यांना रस होता. या प्रवासात त्यांनी अनेकदा “वसुधैव कुटुम्बकम्’चा अनुभव घेतला. घरात अठराविश्वे दारिद्य्र असलेलेसुद्धा या तिघींचे मनापासून स्वागत करीत. अगत्याने घरी बोलावून पाहुणचार करीत. अगदी विनंती करून स्थानिक लोक यांना काही ना काही मदत स्वीकारायला लावतात. गौतमी प्रकाशनच्या “नर्मदा परिक्रमा’ एक अंतर्यात्रा या पुस्तकात भारती ठाकूर यांना परिक्रमेत कठीण प्रसंग आलेच नाहीत असे नाही. पण प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी कोणी ना कोणी त्यांना देवासारखे भेटले आणि त्या पुढे जात राहिल्या.
तिथले रस्ते अत्यंत कठीण, खडबडीत, जंगलातून जाणारे. कधी या मैत्रिणी दलदलीत रुततात तर कधी रेतीत त्यांचे पाय फसतात. पायांना टोचणारे मोठमोठ्या टोकेरी दगडांचे रस्ते हे तर इथले वैशिष्ट्य. कधी अक्षरशः चार-पाच इंचाच्या वाटेवरून चालत जावे लागले. पण या सगळ्या संकटातून त्या धैर्याने वाट चालत राहिल्या. तेथील परिक्रमा काळात या तिघींनी अनेक आश्रमांना, संस्थांना भेटी दिल्या. तिथले कार्य समजावून घेतले. स्वतः लेखिकेला अध्यात्मिक क्षेत्रात रस असल्यामुळे ती जागोजागी वेद, उपनिषदे, गीता यांमधली मार्मिक उद्धृते देते. तुकोबांचे व बहिणाबाईंचे अभंग, विमलाताई ठकार, स्वामी विवेकानंद यांचे प्रसंगानुरूप संदर्भ येतात. आपण एरवी जे अध्यात्मात वाचतो त्याचा प्रत्यय लेखिकेला परिक्रमेच्या काळात येतो. नर्मदेच्या उत्पत्तीसंबंधीची पुराणातली कथाही यात सुंदर तऱ्हेने दिली आहे.
नेहमीच्या व्यावहारिक जीवनात न येणारे कित्येक अनुभव लेखिकेने या काळात घेतले. मौन असले तरी स्वतःशी संवाद चालूच असतो. पण कधीतरी तोही थांबतो. “आनंदाचे डोही आनंद तरंग’ ही भावावस्था ती अनुभवते. निर्मनुष्य किनाऱ्यावर स्वतःच्या धुंदीत चालत असताना नर्मदा मैय्याच्या जलाशयातल्या संथ लहरी आणि स्वतःचा सावकाश होणारा श्वासोच्छ्वास हे एकरूप होतात. कडाक्याच्या थंडीत गाढ झोपेतून अचानक रात्री दोन वाजता जाग येते. बाहेर लख्ख चांदणं. लेखिकेला वाटतं, “घे आम्हाला डोळ्यात साठवून’ असं म्हणत तर या चांदण्यांनी आपल्याला जागं केलं नसेल? हे सारे वाचताना जाणवते की, लेखिकेची ही खरोखरीच अंतर्यात्रा आहे.
जंगले नष्ट झाली तर नर्मदेच्या किनाऱ्यावरची अत्यंत मौल्यवान अशी जैविक विविधता नष्ट होईल म्हणून लेखिकेला दुःख होते. पाण्याखाली जमीन गेल्यावर, इथली सगळी संस्कृतीच नाश पावेल या चिंतेनं ती व्याकूळ होते. हे नुसतं प्रवासवर्णन नाही. प्रसंगानुसार भारती ठाकूर यांनी केलेलं चिंतन, भाष्य वाचकाला समृद्ध करीत जाते.
परिक्रमा करीत असताना चक्रावून टाकणारे काही अनुभव त्यांना आले. काही दिव्य अनुभव आले. देवत्वाची प्रचिती आली. पण संपूर्ण पुस्तकात लेखिकेने कुठेही “चमत्कारा’चा आश्रय घेतलेला नाही. ती तो प्रसंग तर्कनिष्ठ, सजग वृत्तीनेच पाहते आणि तसाच मांडते. पुस्तकातील मजकूर जाड टायपात असल्यामुळे वाचन सहज होते. मुखपृष्ठ साधेच पण अर्थपूर्ण आहे.