-अशोक सुतार
“ऋतू वेदनांचे’ हा गजलकार संदीप माळवी यांचा मराठी गजल संग्रह मुंबई येथील गजल सागर प्रतिष्ठानने प्रकाशित केला आहे. गजलचे अभ्यासक डॉ. राम पंडित यांनी या गजल संग्रहास प्रस्तावना दिली असून गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी चार शब्द लिहिले आहेत. या पुस्तकात 72 मराठी गजलांचा खजिना गजलकार माळवी यांनी रसिकांसमोर रिता केला आहे.
गजलचा शेर हा शायराच्या मनाचा आरसा असतो. शेर गूढ झाले तर त्या आरशावर धूळ साचली असे म्हणावे. शेर जेवढा प्रतीकात्मक असूनही सहजगत्या संप्रेषित होऊन वाचकाच्या मन व बुद्धीत दाखल होईल तेवढा तो आरसा स्वच्छ व नितळ समजावा. माळवी यांची गजल हाच प्रत्यय देते, असे उर्दू साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ गजलकार डॉ. राम पंडित यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटले आहे. माळवी यांनी छोट्या छंदात गजल केल्या आहेत. कमी शब्दांत एक परिपूर्ण गजल करणे अधिक कठीण आहे. गजलकाराच्या सूत्रबद्ध लिखाणाचा कस लागतो. शिवाय आशयाला धक्का न लावता रदीफ, काफिया सांभाळून हे काम करणे म्हणजे तारेवरची कसरत होय. माळवी यांची गजल जीवनाच्या विविध रंगांना रेखाटण्यापेक्षा त्यावर भाष्य करणे अधिक पसंत करते.
“आसवांनी केवढा आकांत केला, जीवनाने जीवनाचा घात केला’, या प्रथम शेरापासून माळवी यांच्या गजलची वेगळी शैली जाणवते. तरीही ते तक्रार करत नाहीत. “काळजावर वारही झाले प्रियेचे, निमूट माझा हुंदका मी शांत केला’ या शेरातून ते दिसून येते. “हे बरे झाले जगाने टाळले, जीवनाला मी पुन्हा कवटाळले’ या शेरमध्ये माळवी यांनी प्रतिकूल गोष्टीतून जगाकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहावे, हे सांगितले आहे. “अंतरीचा दिवा मालवू नको रे’, असे अनेक सांगेसोयरे आपल्याला बजावतात. या दिव्याच्या आधारावर उर्वरित आयुष्याच्या अंधुक प्रकाश वाटेवर आपल्याला वाटचाल करायची आहे, हे सांगताना गजलकार माळवी म्हणतात, “जरी भोवती वादळी रात आहे, दिवा तेवतो मंद हृदयात आहे’. जेव्हा नशिबाचे सारे फासे उलटे पडतात. मनासारखं काहीच घडत नाही, तेव्हा गजलकार म्हणतो, “काढले विकण्यास जेव्हा मी मला स्वस्तात येथे, हाय! सारे त्याच वेळी पांगले बाजार होते’.
माळवी म्हणतात, “ऋतू वेदनांचे पुन्हा माळले मी, पुन्हा दुःख हिरवेच कवटाळले मी. कराया जरा दूर अंधार इथला, खुशीने
स्वतःचेच घर जाळले मी. कसा या ऋतूंचा असे खेळ न्यारा, जळाली घरे ही जरी पावसाळा. माळवी यांची गजल म्हणजे भाषेची सुबोधता, छोट्या व मध्यम छंदातील शेर यांची आहे. मंजुघोषा, मेनका, कादंबरी, व्योमगंगा, गांधर्वी, देवप्रिया, रसना, चंद्रकला, देवप्रिया, भुजंग प्रयास अशा वृत्त/छंदांत माळवी यांनी गजलच्या रचना केल्या आहेत. सहजसुंदर, सोपी भाषा हे माळवी यांच्या गजलचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.