– शर्मिला जगताप
ललितनिबंध हा साहित्यप्रकार मराठी साहित्यात 1930च्या सुमारास लोकप्रिय होऊ लागला. इंग्रजीतील “पर्सनल ऐसे’सारखे त्याचे स्वरूप होते. एखादा विषय घेऊन त्याचा हवातसा विस्तार करणे, तो चटकदार शब्दांत मांडणे असे लघुनिबंधाचे स्वरूप असते. त्यात “मी’चे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते.
अनुभव हलक्या फुलक्या पद्धतीने व्यक्त केलेले असले तरी “मी’ची चिंतनशीलता एखादा दर्जा प्राप्त करून देते. अनुभव उथळ असतील, चिंतनशीलतेचा अभाव असेल तर लेखकाची गुणवत्ता उणावते. मात्र, अनुभव दांडगा असेल आणि चिंतनशीलता स्वभावाचा एक गुण असेल तर लिखाण
दर्जेदार बनते. नंतरच्या काळात विषयाची व्याप्ती वाढली. लघुनिबंध लेखनात नवनवे प्रयोग केले जाऊ लागले. “मी’ अधिक मोकळेपणाने व्यक्त होऊ लागला. “लघुनिबंध’ हा साहित्यप्रकार लवचिक झाला. “ललितनिबंध’ असे नाव रूढ झाले.
शांता लागू यांनी 10 वर्षांत लिहिलेले 53 ललितनिबंधांचा संग्रह म्हणजे “उभ्या आडव्या रेषा’ हे पुस्तक. मध्यमवर्गीय गृहिणीच्या वाट्याला विविध प्रकारचे अनुभव येतात. आजूबाजूचे जग डोळसपणे न्याहाळताना चित्रविचित्र प्रकृतीच्या व्यक्ती भेटतात. लेखिकेने अनुभव हलक्या-फुलक्या शब्दांत आणि सहजसुंदर भाषेत वाचकांसमोर मांडले आहेत.
राजकारणात, समाजकारणात, साहित्य क्षेत्रात घडलेल्या घडामोडींची जाणीवपूर्वक दखल घेण्याची त्यांची सहजप्रवृत्ती आहे. परिणामी सर्वसाधारण अनुभवांना शब्दरूप देताना विविध संदर्भ येत असतात. उदाहरणादाखल “नॉनस्टिक’, “शोधाशोध’, “लाट बाई लाट’, हे ललितनिबंध वाचावेत.
“नावाच्या गावा जावे’मधील खुसखुशीत शैली आणि “उभ्या आडव्या रेषा’ हे चिंतन लेखनाला वरचा दर्जा प्राप्त करून देतात. “वापरा आणि फेका’ या ललितनिबंधात लेखिकेने मानवीप्रवृत्तीवर मार्मिक भाष्य केले आहे. माणसाच्या कृतघ्नपणाचे अनुभव सर्वांच्याच वाट्याला येत असतात.
लेखिका शांता लागू यांनी महाविद्यालयीन जीवनात आकाशवाणीच्या “आशा उद्याच्या’ या युवकांच्या कार्यक्रमात स्वतःच्या कथांचे कथन केले. लेखिकेचा “रुजवण’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. “उभ्या आडव्या रेषा’ हा दुसरा ललितलेखांचा संग्रह आहे. नवलेखकांना वाचक लाभत नाही.
त्यामुळे त्यांचे नवीन आचारविचार वाचकांपर्यंत पोहोचत नाही. नवलेखकांचे नवीन विचार, क्लृप्त्या खरेतर अचंबित करणाऱ्या असतात. समीक्षकही नवलेखकांकडे दुर्लक्ष करतात. मात्र नवलेखकांनाही संधी दिली जावी असे “उभ्या आडव्या रेषा’ हे पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवते. स्नेहवर्धनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.