विजय शेंडगे
अरुण बोऱ्हाडे यांची कवी आणि साहित्यिक ही ओळख काहीशी फिकट असली तरी कामगार नेते या नात्याने संपूर्ण महाराष्ट्राला ते परिचित आहेत. त्यांची कविता देखील अत्यंत प्रांजळ आहे. ते माणूस म्हणून आयुष्याचा आनंद घेत आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या कवितेला देखील माणुसकीचा वास येतो-
तू कधी एखाद्याचा श्वास असतोस
तू कधी अनेकांचा विश्वास असतोस
अगदी असेच एका माणसाला दुसऱ्याचा श्वास होता आले पाहिजे आणि अत्यंत फसव्या जगात त्याच्यावर एखाद्याला विश्वास टाकता आला पाहिजे. अशी अपेक्षा कवी व्यक्त करतो. बोऱ्हाडे यांची कविता काव्यविषयाचे बंधन मानत नाही. ती सामाजिक जाणिवा व्यक्त करतेच परंतु निसर्गात देखील रमते.
ती राजकीय दांभिकतेवर आसूड ओढतेच परंतु सामाजिक गुलामगिरीवर देखील प्रश्न उपस्थित करते. जो माणूस यश पैशात मोजत नाही त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा प्रवास खडतरच असतो. परंतु आपले आयुष्य कितीही खडतर असले तरी आपण त्या आयुष्यातली वेदना आपल्याला झाकून ठेवता यायला हवी, अशा स्वरूपाची भावना व्यक्त करताना कवी म्हणतो- आलो जरी इथवर. खडतर प्रवासात
वेदना मुकीच माझी, आहे झाकल्या मुठीत दुःख मुकं असावं आणि सुख बोलकं असावं. दुःख झाकून ठेवता यायला हवं आणि सुख दुसऱ्याच्या ओंजळीत घालता यायला हवं. हे ज्याला साध्य होतं त्याला आयुष्याला हसतमुख सामोरं जाता येतं.