– शर्मिला जगताप
मेळघाट हे नाव ऐकले की आपल्या समोर रूबाबदार वाघ येतो. मेळघाटाचे अप्रतिम सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर येते. मेळघाट दुर्गम असला तरी मनोरम्य प्रदेश आहे. तिथले हिंडणे नेहमीच आल्हाददायक असते. रस्ते एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जातात. पण या सौंदर्यामागे आदिवासींच्या भावना लपलेल्या आहेत. त्या भावनांना लेखक “मेळघाट ः शोध स्वराज्याचा’ या पुस्तकातून वाट मोकळी करून देतो.
या पुस्तकाला “मेळघाट ः शोध स्वराजाचा’ हे शिर्षक जाणीवपूर्वक दिलेले आहे. लेखक मेळघाटमधील स्वराज्याचा, स्वशासनाचा अर्थ उलगडून सांगतात की, आदिवासींना जंगलाचा एखादा हिस्सा व्यवस्थापनासाठी द्यायचा, एवढ्यापुरती मेळघाटमधली ही प्रक्रिया मर्यादित नाही. त्यामागे एक व्यापक तत्त्व आहे- ते म्हणजे स्वशासनाचे. ते अर्थातच आदिवासींपुरते मर्यादित नाहीत, पण सध्या आपण ते आदिवासींकडून शिकतो आहोत.
स्वशासनामध्ये केवळ आपल्या गावाचा कारभार आपण चालवायचा एवढेच अभिप्रेत नाही; तर त्या पलीकडे जाऊन आपल्या भोवतालच्या सगळ्या सृष्टीची आपण काळजी घ्यायची, आपले गाव हे एक कुटुंब आहे असे समजून त्यातील प्रत्येक व्यक्तीची कदर करायची, आपल्या गावापलीकडेही एक मोठा समाज आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी नातेसंबंध जोडायचे आणि ह्या सर्वांमधून आपले जगणे अधिक अर्थपूर्ण करायचे- अशी कामना आहे. ह्यालाच स्वराज्य असे म्हणतात.
स्वराज्य हे साधन आहे आणि साध्यही. हे प्रत्यक्षात कसे करता येईल, त्यामध्ये कोणत्या उडचणी येतील, त्या अडचणीचे निराकरण कसे करायचे ह्याचा शोध म्हणजे स्वराज्याचा शोध. आणि मेळघाटमधील हा स्वराज्याचा शोध या पुस्तकात उलगडला आहे. मेळघाटमध्ये हिंडताना असे जाणवत राहते की, तिथले आदिवासी एक प्रकारे ह्या स्वराज्याचा शोध घेत आहेत. मात्र स्वराज्याची संकल्पना त्यांना पूर्णपणे कळली किंवा तिचे सगळे पैलू उलगडले आहे असे नाही.
वस्तुनिष्ठ माहिती, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अंगांनी लेखकाने मेळघाट विस्तृत स्वरूपात वाचकांसमोर उभा केला आहे. मेळघाटविषयी पारंपरिक माहिती किंवा मेळघाटची पर्यटन ही ओळख बाजूला ठेवून वेगळा मार्ग चोखाळत वाचकांपुढे एक नवा दृष्टिकोन उभा करण्यात लेखकाची लेखणी यशस्वी ठरली आहे.
मिलिंद बोकील लिखित आणि साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक 190 पानांचे असून किंमत 200 रुपये आहे. मेळघाटचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम संदर्भ ग्रंथ ठरावा.