शर्मिला जगताप
स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात जे अक्षर-ग्रंथ निर्माण झाले त्यात “माणदेशी माणसं’चा समावेश होतो. या व्यक्तिचित्रांत जुन्या कथेतील गोष्ट तर आहेच पण जीवनाच्या अस्सल गाभ्यालाच स्पर्श करणारी नवलकथेची किमया देखील आहे.
अंधारातून पहाट व्हावी, कळीचे फूल व्हावे, इतक्या सहजतेने रेखाटलेली ही चित्र अस्सल मराठी आहेत. दरिद्री माणदेशातील, सामान्य जीवनातील न संपणारे दुःख निरागसपणे व्यंकटेश माडगूळकर सांगतात. माणसं सुखासाठी धडपडतात, पण त्यासाठी ती जन्माला आलेली नसतात असा उदार विचार मनात येतो. जीवनातील हे कारुण्य माडगूळकरांनी कलावंताच्या अलिप्ततेने टिपले आहे. त्यामुळे त्यांची ही माणसं आपल्याला विसरता येत नाही.
गावच्या उजाळ माळरानाचा उन्हाळा, दुष्काळाची तहान असे भाव व्यक्तीच्या चेहऱ्यावर दाखविले आहेत. यातील व्यक्ती जणू आपल्या बाजूलाच आहेत असा भास होतो. पुस्तक वाचल्यावर लगेच त्यांच्या गालावर ओघळलेले अश्रू पुसायला जावेत अशी वाचकांची तीव्र इच्छा होते हेच माडगूळकरांच्या लेखणीचे सामर्थ्य.
या पुस्तकाच्या सुरुवातीलाच धर्मा रामोशी हे व्यक्तिचित्रण आहे. ही कथा वाचताना धर्मा क्षणभरही नजरेआड जात नाही. धर्माची लेक बजा, तिला नवऱ्याने टाकून दिल्याने तिचे
दुःखही वाचकांच्या नजरेतून सुटत नाही. लेखक काही कामानिमित्ताने अठराविश्व दारिद्य्र असलेल्या, अंगावर सुरकुत्या पडलेल्या धर्माच्या घरी जातो तेव्हा धर्मा बजेला आंबचा शिसा देण्यास सांगतो.
तेव्हा बजाचा काळासावळा हातच फक्त बाहेर येतो. शिसा ठेवून पुन्हा आत जातो. लेखकाला प्रश्न पडतो. लेखकाला धर्माची परिस्थिती बघवत नाही. आईशी बोलून ते धर्माला रोज भाकरीचे पीठ घेऊन जायला सांगतात. थरथरत्या हातात काठी घेऊन चालणाऱ्या धर्मा रामोश्याला लेखक बजाला पाठवत जा असे सांगतो. पण तरीही बजा लेखकाच्या घरी पीठ घ्यायला येत नाही.
काही दिवसांनी धर्मा खाली मान घालून लेखकाजवळ जुनेपुराणे धोतर मागतो. लेखक एक चांगले वापरातले धोतर धर्माला देतो. दोन-तीन दिवसांनी बजा लेखकाच्या घरी पीठ न्यायला येते. तेव्हा लेखकाला बजा दरवाजाच्या आडून एक हात बाहेर काढून शिसा का ठेवते, याचे रहस्य उलगडते. कारण बजाने आज साडीसारखे जे धोतर नेसले असते, ते लेखकाने धर्माला दिलेले धोतर असते.
ग्रामीण लोकांच्या भावना, जीवन याचे हुबेहुब चित्रण माडगूळकरांनी केले आहे. या पुस्तकात एकूण 16 व्यक्तिचित्रणं आहेत. प्रत्येक व्यक्ती जीवन जगण्याची प्रेरणा देते.