मुंबई – अजय देवगण आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला तान्हाजी : द अनसंग वॉरिअर चित्रपट सध्या राज्यासह देशभरात धुमाकुळ घालत आहे. मात्र, या चित्रपटातील काही प्रसंगाला मॉर्फिंग करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तर आता छत्रपती संभाजी राजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजी राजे म्हणाले कि, पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी. आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये, असे त्यांनी म्हंटले आहे.
आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी.
सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये.— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 21, 2020
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हॅंडलवरून हा मॉर्फ केलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे. शाहीन बाग से उन्होंने वोट बॅंक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे, असे संवादही यात घालण्यात आले आहेत. या प्रकारावर ट्विटवरून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. सायबर सेलला टॅग करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ट्विटरवर करण्यात येत आहे.