विष्णू शिंदे
डॉ. लता पाडेकर यांच्या “साठवणीतील आठवणी’ हे यशोदीप पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सुबक बांधणीतील आकर्षक पुस्तक. या पुस्तकाचे मुखपृष्ठ निखिल लंभाते यांनी मोठ्या कल्पकतेने चित्रित केले आहे. ते समर्पक तर आहेच; पण आशयगर्भही आहे. पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांची पत्ररूप प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकातील सर्वच आठवणी पाडेकर मॅडम यांच्या मनोकोषातील संवेदनशील असा कोमल भावनांचा परिपाक आहेत. त्या त्यांच्या जीवनानुभवातून प्रकटल्या आहेत. या सर्व आठवणी वाचकांना खिळवून ठेवतात. कारण, त्या सर्व त्यांच्या सहजसुलभ अशा ललितरम्य भाषाशैलीतून उमटल्या आहेत. या आठवणींमध्ये त्यांनी आपले बालपण, शालेय व कॉलेज जीवन, सासर माहेरच्या आठवणी आणि याबरोबरच त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर मायेची पाखर घालणाऱ्या देवमाणसांच्या आठवणी ग्रंथित केल्या आहेत.
बालपणीच्या आठवणीमध्ये त्यांच्या जुन्नर तालुक्यातील पूर्व शिवेवर डोंगराच्या पायथ्याशी “उंच खडक’ या माहेरच्या गावी घडलेली “बेतलं होतं जिवावर’ ही घटना त्यांच्या लहान बहिणीवर त्यांच्यामुळेच गुदरलेल्या प्रसंगातून त्या कशा स्वतःच्या अक्कलहुशारीने व धाडसाने बहिणीची सहीसलामत सुटका करतात यावर आधारित आहे. “सविनय वंदन’ ही घटना त्यांच्या कॉलेज जीवनात घडलेली काळजाचा ठोका चुकवणारी घटना असून वाचकाच्या मनाला चुटपूट लावणारी आहे. यामध्ये दुसरीकडेच जाणारी बस चुकून पकडली. या अचानक उद्भवलेल्या भयावह प्रसंगी बसचे ड्रायव्हर, कंडक्टर व रिक्षावाले काका हे देवासारखे भेटले म्हणून बचाव झाला. त्यावेळचे वातावरण, माणसं आजच्यासारखी असती तर? असा प्रश्न मनात राहतो.
“अरेरे! म्हणजे नापास?’ या आठवणीत डॉ. न. म. जोशी यांची लेखिकेबद्दलची आपुलकी दृग्गोचर होते. स्वतःला घडवताना, सात रुपये ते सातासमुद्रापार विलक्ष योगायोग, कृतज्ञता, खरी श्रीमंती आदी आठवणींतून लेखिका व त्यांचे पती डॉ. भरत सर या दोघांच्या जिद्दीचे, चिकाटीचे व परिश्रमांचे दर्शन घडते. पाडेकर मॅडम यांचे सासरे- जे पूर्वी मुंबईमध्ये कापड गिरणी कामगार होते. ते कापड गिरणी कामगारांच्या संपामुळे कायमचे केळेवाडी या आपल्या गावी आले. त्यांचा मधुमेह विकोपाला गेलेला तसेच त्यांच्या मातोश्री यांचा मोतीबिंदू वाढलेला, तर पणजाई लुगड्यात पाय अडकून पडलेल्या या सर्वांबद्दल पाडेकर दाम्पत्याने घेतलेले कष्ट, सोसलेल्या यातना या वर्णन करण्यापलीकडच्या आहेत. पण त्यांना बरे करण्यात दोघेही यशस्वी झाले, हे महत्त्वाचे.
डॉ. भरत सर या आपल्या पतीमुळे लेखिकेची इथिओपियाची प्रवास यात्रा वाचकांनाही ही यात्रा घडवते. संत साहित्याचा त्यांचा अभ्यास हा वाचकांसाठी प्रेरणादायी ठरला. डॉ. पाडेकर मॅडम या आपली येरवडा येथील लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्र. 6 ही 27 वर्षांपूर्वी केवळ एका छोट्याशा वर्गखोलीत बसणाऱ्या 40 विद्यार्थ्यांची शाळा आज प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे, हे वाचून वाचकाचे मन आश्चर्यचकित झाले नाही, तरच नवल!
हे पुस्तक या दाम्पत्याच्या चरित्राचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या त्यांच्या साठवणीतल्या आठवणी निरंतर स्मरणात राहतील, अशा निश्चितच आहेत. डॉ. पाडेकर मॅडम यांच्या या हृदयस्पर्शी आठवणींच्या या अप्रतिम साहित्य कलाकृतीला माझ्या हार्दिक शुभेच्छा!