माधुरी तळवलकर
राजू परुळेकर हे ई-टीव्हीच्या “संवाद’ या कार्यक्रमातून घरोघरी यापूर्वी पोहोचले आहेत. “माणसं ः भेटलेली न भेटलेली’ या पुस्तकात काही महत्त्वाच्या व्यक्तींचे त्यांनी चित्रण केले आहे. यामध्ये लेखक, शास्त्रज्ञ, राजकारणी, कलावंत आहेत. अगदी आदि शंकराचार्यांपासून परवीन बाबीपर्यंत जवळजवळ 75 व्यक्तींविषयी अतिशय नेमक्या भाषेत त्यांचे व्यक्तिमत्त्व उभे करणारे हे लेख वाचणे म्हणजे खरोखर मेजवानीच आहे.
सर्वसामान्य माणसाला माहीत नसलेला सूक्ष्म तपशील जाता जाता ते आपल्या लेखनातून देतात. उदाहरणार्थ, महाराज रणजितसिंहांविषयी ते लिहितात, “रणजितसिंहांनी लाहोर जिंकले तेव्हा तेथील सुनहरी मशीद त्यांनी मुसलमानांना परत केली; पण त्याचबरोबर महाराज रणजितसिंहांनी जेव्हा अफगाणिस्तान जिंकले (अफगाणिस्तान जिंकणारे ते एकमेव परकीय व्यक्ती होत.) तेव्हा तिथे शहा सूझाला स्थानापन्न करताना 1024 मध्ये गझनीच्या महंमदने लुटून नेलेले हिंदूंच्या सोमनाथ मंदिराचे दरवाजे परत केले पाहिजेत, ही अट त्यांनी घातली होती!’ व्यक्तिचित्रे वाचताना अशी कितीतरी महत्त्वाची माहिती आपल्याला सहजपणे मिळून जाते. या पुस्तकातील लेखांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, यात व्यक्तींची माहिती लिहिताना ते त्यांची वैयक्तिक माहिती जशी देतात; तशीच आजूबाजूच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचीही ते नोंद करतात. डॉ. प्रवीण म्हात्रे या शास्त्रज्ञाविषयी वाचून त्यांच्याविषयी जितका आदर वाटतो तितकाच भारतात आणि महाराष्ट्रातही ज्ञानाविषयी असलेला अनादर तीव्रतेने जाणवतो.
डॉ. म्हात्रे यांनी जगात पहिल्यांदाच बीजांडाचे अवयवरोपण करण्याचे तंत्र शोधून काढले. हा स्त्रीरोगशास्त्रातला चमत्कार होता. या अत्यंत महत्त्वाच्या संशोधनासाठी बीबीसीने त्यांना “मॅन ऑफ द इयर’ घोषित केले. त्या वेळी बीबीसीवर त्यांची मुलाखतकर्ती म्हणाली, “आजवर वैद्यकशास्त्रातले आधुनिक ज्ञान पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेले आहे; पण आज पहिल्यांदाच अशी वेळ येत आहे की, डॉ. प्रवीण म्हात्रेंच्या रूपाने हे ज्ञान पूर्वेकडून पश्चिमेकडे येत आहे. डॉ. म्हात्रे, तुमच्या देशात प्रचंड उत्सवी वातावरण असेल ना यामुळे?’ पहिले वाक्य ऐकून आनंदलेले डॉ. म्हात्रे नंतरचा प्रश्न ऐकून गोठूनच गेले. कारण आपणापैकी देशात कुणालाच डॉ. म्हात्रेंनी वैद्यकीय क्षेत्रात काय क्रांती केलीय हे ठाऊकच नव्हते. आपली सर्व बाबतीतली अनास्था याला कारणीभूत आहे. इतकेच काय, ज्या शस्त्रक्रियेमुळे डॉ. म्हात्रेंनी जगभर हिंदुस्थानचा नावलौकिक पोहोचवला ती क्रांतिकारी शस्त्रक्रिया भारतात करण्याची परवानगी डॉक्टरांना अनेक वर्षांच्या मिनतवाऱ्यांनंतर अपमानकारक अटींवर मिळाली आहे.
विजय तेंडुलकर आणि प्रिया तेंडुलकर यांच्यावरचे दोन दीर्घ लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. तेंडुलकरांची प्रतिभा, स्वभाव, साहित्यप्रवास यावर सहृदयतेने आणि डोळसपणे लिहिलेला हा लेख आहे. तेंडुलकरांसारख्या मितभाषी आणि लेखनामुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रतिभावंताला समजून घेण्यासाठी या लेखाचा नक्कीच उपयोग होतो. प्रिया तेंडुलकरवरचाही लेख फार छान उतरला आहे. त्यांच्या स्वभावातले कंगोरे, त्या व त्यांचा भाऊ राजू, प्रिया तेंडुलकर आणि त्यांचे वडील यांच्यामधील नात्यांचे पदर लेखक जाणतेपणाने उलगडून दाखवतात. या पुस्तकात भेटणाऱ्या माणसांची चरित्रवजा माहिती देण्याऐवजी लेखक त्यांच्या अंतरंगात शिरतात. त्यांचा पिंड समजावून घेताना दिसतात आणि म्हणून हे पुस्तक वाचल्यावर वरवरचे काही वाचल्यासारखे न वाटता काहीतरी ठोस, प्रगल्भ असे वाचल्याचा आनंद मिळतो.