मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह नितीश सारडा आणि फिरोज शेख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावत दिलासा देण्यास नकार दिला आहे. नियमाप्रमाणे जामीनासाठी आधी सत्र न्यायालयात याचिका करावी, असे निर्देश न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिले आहेत. यामुळे अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांनी उच्च न्यायालयात जामीन मिळावा यासाठी धाव घेतली होती. या अर्जावर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा उच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करुन ती अटक बेकायदेशीर ठरवून त्याला जामीन देऊ शकत नाही, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरत खंडपीठाने निकालाचे वाचन केले. अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींनी जामीनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज करावा. नियमानुसार त्या कोर्टातून मग हायकोर्टाचा पर्याय त्यांच्यासाठी खुला राहिल, असे निर्देश हायकोर्टाने दिले.
दरम्यान उच्च न्यायालयात सुनावणी होण्याच्या अर्धा ते एक तासापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी जामीनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पुढील चार दिवसात निकाल देण्याचे निर्देश हायकोर्टाने सत्र न्यायालयाला दिले आहेत.
चार दिवसांत सत्र न्यायालयात सुनावणी झाली नाही तर अर्णब गोस्वामी तळोजा कारागृहातच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळणार की त्यांची दिवाळी तुरुंगातच साजरी होणार हे अलिबाग सत्र न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.