नवी दिल्ली/ कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसचे नेते जाकीर हुसैन यांच्यावर गेल्या महिन्यात झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ कडे सोपवला आहे. या बॉम्ब हल्ल्यामध्ये जाकीर हुसैन हे गंभीर जखमी झाले होते. जाकीर हुसैन यांनी तृणमूल कॉंग्रेस सोडावी यासाठीच हा बॉम्ब हल्ला करवण्यात आला होता, असा संशय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला होता.
“एनआयए’च्या कायद्यानुसार केंद्र सरकार देशातील कोणत्याही तपास संस्थेकडील प्रकरणाचा तपास “एनआयए’कडे वर्ग करू शकते. त्यानुसार केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास स्वतःहून “एनआयए’कडे वर्ग केला आहे. “एनआयए’ने या संदर्भात स्फोटकांशी संबंधित कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली स्वतंत्रपणे “एफआयआर’ दाखल केली आहे. अद्याप या प्रकरणी कोणत्याही दहशतवादी कृत्यांचा आरोप करण्यात आलेला नाही. मात्र जर तपासादरम्यान या प्रकरणात एखाद्या दहशतवादी संघटनेचा सहभाग अथवा दहशतवादी कृत्याचे धागेदोरे सापडले तर त्याच्याशी संबंधित कलमेहीजोडण्यात येतील, असे या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींनी सांगितले.
मुुर्शिदाबादच्या निमित्ता रेल्वे स्थानकात झालेल्या या स्फोटामध्ये राज्यमंत्री जाकीर हुसेन आणि 20 पेक्षा अधिक जखमी झाले होते, पश्चिम बंगाल “सीआयडी’ने स्फोटाच्या संदर्भात दोन जणांना अटक केली आहे.