मुंबई : बॉलिवुडमध्ये असे अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे जे खऱ्या घटनांवर आणि आयुष्यावर आधारीत असे आहेत. घडून गेलेल्या घटनांबद्दल माहिती देणे, जागरूकता निर्माण करण्यासाठी चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे असे मानले जाते. बॉलिवुडमध्ये नेहमीच वास्तविक जीवनातील घटनांवर अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांनाही असे चित्रपट आवडतात असे दिसून आले आहे. काही चित्रपट प्रत्यक्ष आयुष्यातील प्रेमकथेवर आधारीत आहेत तर काही इतिहास काळात घडलेल्या पराक्रमाची किंवा धडा शिकवणाऱ्या घटनांवर आहेत. सामाजिक विषयांवरील चित्रपटांवरही प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवलेली आहे. अशाच काही सत्य घटनांवर आधारीत चित्रपटांविषयी…
नो वन किल्ड जेसिका
जेसिका लाल नावाच्या मॉडेलची दिल्लीतील बारमध्ये अनेक लोकांच्या समोर गोळ्या घालून 29 एप्रिल 1999 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनु शर्मा हा एका प्रभावी राजकीय नेत्याचा मुलगा होता. जेसिकाची बहिण सबरिना हिने मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि जेसिकाला न्याय मिळावा म्हणून मोठा लढा दिला. सबरिनाच्या या लढ्यावर हा चित्रपट आधारीत आहे. यामध्ये सबरिनाची भूमिका विद्या बालनने केली आहे. चित्रपटात राणी मुखर्जीने पत्रकाराची भूमिका केली आहे. जिने या लढ्यासाठी सबरीनाला खूप मदत केली होती.
पानसिंग तोमर
भारतील लष्करातील जवान पानसिंग तोमर यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. त्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळताना सुवर्णपदक जिंकले होते. परंतु त्यांच्यावरील अन्यायामुळे ते इथल्या शासकीय व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय उरला नाही. 1981 मध्ये पोलिसांनी एनकाऊंटरमध्ये त्यांना ठार मारले. त्यांच्या जीवनावरील चित्रपटाचे दिग्दर्शन तिग्मांशु धुलिया यांनी केले होते.
तलवार
2015 मध्ये चित्रित झालेला हा चित्रपट नोएडातील बहुचर्चित दुहेरी खून प्रकरणावर आधारीत होता. नोएडातील डॉक्टर दांपत्य नुपूर आणि राजेश तलवार यांना त्यांची एकुलती एक मुलगी आरुषी आणि नोकर हेमराज यांच्या खूनप्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली. तलवारी खेरीज 2015 मध्येच रहस्य नावाने याच घटनेवर आणखी एक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. तलवार चित्रपटात कंकणा सेन, इरफान खान आणि नीरज काबी हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केल होते.
मांझी – द माऊंटन मॅन
दशरथ मांझी नावाच्या बिहारमधील एका गरीब मजुराच्या प्रेरणादायी कार्यावर आधारीत असा हा चित्रपट आहे. एका अपघातात दशरथ मांझी यांची पत्नी गंभीर जखमी झालेली असते आणि त्यांच्या गावातून रुग्णालयाच्या ठिकाणी मोठ्या शहरात पोचण्यासाठी लांबचा रस्ता असतो. त्यामुळे त्यांच्या पत्नीचे निधन होते. त्यामुळे दशरथ मांझी अशक्य असे काम हाती घेतात. शहराच्या ठिकाणी जवळच्या रस्त्याने जाता यावे यासाठी ते गावाजवळील डोंगर फोडून रस्ता करण्याचे काम सुरू करतात. एक हातोडा आणि छिन्नीच्या मदतीने डोंगर फोडून ते नऊ मीटर रुंद आणि 110 मीटर लांबीचा रस्ता करतात आणि डोंगरापलीकडील रस्त्याला जोडतात. केतन मेहता दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी खूप कौतुक केले होते.
एअरलिफ्ट
2016 मध्ये निर्मिती असलेला आखातातील युद्धावर आधारीत हा पहिला चित्रपट आहे. इराकचा तत्कालिन अध्यक्ष सद्दाम हुसेनने 1990 मध्ये कुवेतवर आक्रमण केल्यानंतर कुवेतमध्ये असणाऱ्या सुमारे एक लाख 70 हजार भारतीयांना यशस्वीपणे मायदेशी आणण्यात आले होते. भारत सरकारबरोबरच कुवेतमधील भारतीय व्यावसायिक मथुनी मॅथ्यूज यांनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावर आधारीत या चित्रपटात मॅथ्यूज यांची भूमिका अक्षयकुमारने केली होती. मॅथ्यूज यांचे 2017 मध्ये निधन झाले.
राजी
एका काश्मीरी महिलेच्या भोवती या चित्रपटाचे कथानक आहे. राजी नावाच्या या महिलेने पाकिस्तानात हेरगिरी करण्यासाठी त्या देशाच्या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न केले. त्यातून 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्या देशातील अनेक गुपिते तिने भारतीय लष्करापर्यंत पोचवली होती. 2008 मध्ये हरिंदर सिक्का यांनी कॉलिंग सहमती नावाची कादंबरी लिहिली होती. त्यावर आधारीत चित्रपट मेघना गुलजार यांनी 2018 मध्ये तयार केला. या चित्रपटात अलिया भट आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बाटला हाऊस
दिल्लीतील बाटला हाऊस याठिकाणी 19 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या चकमकीत दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिदिनच्या दहशतवाद्यांवर कारवाई केली होती. त्याविषयी अनेक वाद निर्माण झाले. बनावट एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप पोलिसांवर झाला. या ऑपरेशनचे नेतृत्व करणारे दिल्लीच्या विशेष पथकाचे अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा या चकमकीत हुतात्मा झाले. या चित्रपटात त्यांची भूमिका जॉन अब्राहमने केली आहे. चित्रपटात त्याचे नाव संजीवकुमार यादव असे आहे. 2019 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
टॉयलेट एक प्रेमकथा
एका युवतीचे लग्न झाल्यानंतर सासरी टॉयलेट नसल्याने तिने टॉयलेट बांधण्याचा निर्धार केला. तिच्या या भूमिकेला सासरच्यांनी विरोध केल्याने ती माहेरी निघून जाते. सासरी टॉयलेट बांधण्यात आल्यानंतरच ती परत येते असा हा खऱ्या घटनेवर आधारीत चित्रपट आहे. उघड्यावर शौचाला जाऊ नये या मोहिमेला आणि स्वच्छ भारत अभियानाला बळ देणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका आहे.