मुंबई – राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मद्यविक्रीची परवानगी देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. या मागणीवर सामानातून वाईन, डाईन आणि फाईन. व्वा! राज बाबू!!’ या मथळ्याखाली खरपूस समाचार घेण्यात आला आहे. यानंतर मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक पोस्ट लिहून संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
काय आहे अमेय खोपकर यांचा लेख?
बोलबच्चनचा हॅगओव्हर!
मैं किस पथ से जाऊँ ? असमंजस हैं भोलाभाला……
खूप दिवस झाले… हल्ली कुणीच विचारत नाही मला !!!!
‘मधुशाला’ मधली ही ओळ खास बोल बच्चन राऊतसाठी.
नागू सयाजी वाडीत बसून शब्दांचे बुडबुडे काढणारे संजय राऊत हे सध्या आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाही या भावनेने पछाडलेले दिसतात. अन्यथा राजसाहेबांनी केलेली सूचना त्यांच्या कार्यकारी टाळक्यात शिरली असती. वेळ काय आणि यांचं चाललंय काय? डाईन, वाईन वगैरे शब्दांचे खेळ करत लाॅकडाऊनमध्ये वेळ बरा जाण्यापलिकडे फार काही निष्पन्न होणार नाही.
राजसाहेबांनी जी सूचना केली ती ताकाला जाऊन भांडे न लपवता केली आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना आता नैतिकतेच्या मायाजालात न अडकता वैधानिक मार्गाने काही उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे. त्यात तळी उचलून धरण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि केवळ दारूच नव्हे, तर उपाहारगृहे आणि अन्य व्यवहारदेखील सुरू करण्याचीही सूचना राजसाहेब यांनी केली, हे या रडतराऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही. त्यामुळेच राजसाहेबांच्या विधायक सूचनेची खिल्ली उडवण्याचा विचार आला असावा. आणखी एक, तुमचे संकटमोचक अजित पवारांनीही हीच मागणी करणारे पत्र देशाच्या प्रधानमंत्र्यांना लिहीले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही असेच विधान काही दिवसांपूर्वी केले होते. तेव्हा त्यांची खिल्ली उडवण्याची हिंमत या बोरूबहाद्दराला झाली नाही, की मालकांची भीती वाटली? बोला रडत राऊत बोला!
नागू सयाजी वाडीतल्या बोरूबहाद्दरांची ‘फ्रायडे नाईट’ जोरदार रंगली असावी, आणि त्याच हॅगओव्हरमध्ये राजसाहेबांच्या पत्रातले सविस्तर मुद्दे बुडाले. की जे राजसाहेबांना सुचलं ते आपल्याला आधी का सुचलं नाही, या दु:खाच्या बेहोषीत ‘डाईन, वाईन…’ वगैरे शब्दांचे खेळ कागदावर सांडले?
‘मधुशाला’ या कवितेतल्या काही ओळी तुमच्यावर अगदी फिट्ट बसतात.
‘किस पथ से जाऊॅं?’ अमंजस में हैं भोलाभाला
तेव्हा शॅडो संपादक, घरी रहा, सुरक्षित रहा, तब्येतीत रहा
आपला
अमेय खोपकर
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात लोकांना चिकन, मटण, भाजी, धान्य, दूध, पाणी मिळत आहे पण खरी आणीबाणी पिणाऱ्यांची झाली आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनाची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत, अशा शब्दात सामनातून टीका केली आहे.